भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर….

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, दि. १० : जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्याने या भागातील जनतेस होणारा त्रास आता बंद होणार आहे. आलापल्ली – भामरागड-लाहेरी-गुंडेनूर- बिनागुंडा- कुवाकोडी ते राज्य सीमा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वरील गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु झालेले आहे. यात ८ पायव्याचे काम पूर्ण झालेले असुन उर्वरित ६ पायव्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत गुंडेनूर नाल्यावर १४० मीटर्स लांबीचे २ पूल व १६४४ मीटर्स लांबीचा जोडरस्ता समाविष्ट असुन सदरील प्रकल्प मे २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली, विवेक मिश्रा यांनी दिली.

          गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून भौगोलिक दृष्टया अडचणीचा आहे. पूर्वेकडील तालुके वनव्याप्त असून भामरागड, टिपागड, पाळसगड व सुरजागड हा भाग डोंगराळ आहे. तसेच जिल्हयात गोदावरी, वैनगंगा, प्राणहिता, पर्लकोटा इंद्रावती इत्यादी प्रमुख नद्या असून बऱ्याच उपनद्या व नाले आहेत. अशा भौगोलिक परिस्थितीत येथील लोकसंख्या विखुरलेली आहे. त्यामुळे विशेषत: पावसाळयात दळणवळणाची समस्या उद्भवते. सदर जिल्हयाच्या विकासाकडे शासनाचे विशेष लक्ष असुन जीर्ण रस्ते व पूल यांची दुरुस्ती करणे व नवीन रस्ते व पूल बांधणे याबाबत शासन सजग आहे. रस्त्यांच्या व नद्या/नाल्यांच्या अडचणीमुळे येथील जनतेस होणारा त्रास दूर करणे, क्वचित प्रसंगी होणारे मृत्यू टाळणे, याबाबत शासन कटीबद्ध असल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली.

          रस्त्यांचे व पूलांचे बांधकाम शीघ्र गतीने पूर्ण करण्याकरीता जिल्हा प्रशासन तत्पर असून प्रकल्प राबवितांना येणारे विविध स्तरावरील अडथळे संबंधित विभागांकडून दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्या जातात. जनतेस नाहक त्रास होऊ नये व विनाकारण जिवित हानी होऊ नये, याबाबत शासन व प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.