दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीत घुंडरे कुटुंबाने इतिहास घडवत एक-दोन नव्हे तर तब्बल पाच जागांवर विजय मिळवला आहे. वेगवेगळ्या प्रभागांतून आणि पक्षांतून मिळालेल्या या यशामुळे आळंदीच्या राजकारणात घुंडरे आडनाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे.
शिवसेनेकडून तीन घुंडरे नगरसेवक विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १ मधून आदित्य घुंडरे आणि ऋतुजा घुंडरे हे पती-पत्नी एकाचवेळी विजयी ठरले असून, हा निकाल विशेष चर्चेचा ठरला आहे. तर प्रभाग क्रमांक ७ मधून अरुणा घुंडरे यांनी शिवसेनेतर्फे विजय मिळवला.
भाजपकडून दोन घुंडरे नगरपरिषदेत दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधून सुनील ज्ञानेश्वर घुंडरे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक ३ मधून पुजा संजय घुंडरे यांनी यश संपादन केले.
कुटुंबातील पाच सदस्यांचा एकाच निवडणुकीत विजय हा आळंदीच्या राजकारणातील दुर्मीळ योग मानला जात आहे. स्थानिक विकासकामांचा मुद्दा, मतदारांशी असलेला थेट संपर्क आणि प्रभावी प्रचार यामुळे हा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
नगरपरिषदेत आता घुंडरे गटाची संख्या आणि प्रभाव वाढल्याने सत्तास्थापनेपासून ते महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आळंदीच्या राजकीय समीकरणात ‘घुंडरे’ हे नाव पुन्हा एकदा ताकदीने पुढे आले आहे.



