दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आज तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 12 नोव्हेंबर) देखील एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या शून्यावरच आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जयराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. दरम्यान, 17 नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र, पहिल्या तीन दिवसांत कोणत्याही इच्छुकाने अर्ज दाखल न केल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप सुरुवात झालेली नाही.
राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांमुळे अर्ज प्रक्रियेत संथगती दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



