ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- आरमोरी विधानसभा क्षेत्रात झालेला जनता दरबार आमदार रामदास मसराम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.हा दरबार शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी आरमोरी तहसील सभागृहात पार पडला. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या व प्रश्न थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडता यावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यातील दूरदूरच्या गावांतून पाऊस व काही ठिकाणी पुर असताना मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची कमतरता, सिंचनासाठी अपुरा वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा अपुरी असणे, शैक्षणिक अडचणी, वीज वितरण कंपनीने बसविलेले नवीन मीटर, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणारा विलंब, महसूल व इतर शासकीय विभागातील प्रलंबित प्रकरणे आदी विविध प्रश्न मांडले.
दरबारात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची सविस्तर नोंद घेण्यात आली. काही तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात आले, तर गुंतागुंतीच्या प्रकरणांवर ठराविक कालावधीत कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
याप्रसंगी आमदार रामदास मसराम म्हणाले,
“आरमोरी विधानसभा क्षेत्रातील लोकांनी मला दिलेला विश्वास फेडणे ही माझी जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने त्वरित, पारदर्शक आणि जबाबदारीने उपाय करणे आवश्यक आहे. जनता दरबार हा लोक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवादाचा प्रभावी दुवा आहे. हा उपक्रम नियमितपणे राबवून जनतेच्या प्रत्येक अडचणीला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल,”असे त्यांनी सांगितले.
दरबारात महिलांनी शासकीय योजनांमधील अडथळे मांडले, शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा व पीकविमा याबाबत मागण्या केल्या, युवकांनी रोजगाराच्या संधी व कौशल्यविकासाशी संबंधित प्रश्न मांडले. अनेकांना तिथेच तातडीने मार्गदर्शन व मदत मिळाली.
या ऐतिहासिक दरबारात आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य, नगरपरिषद माजी पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांचे आभार मानत जनता दरबारचे कैतुक केले.



