दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
राधाकृष्ण चौक,बाबुपेठ,चंद्रपूर परिसरातील निवासी इमारतीवर सुरू असलेल्या मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाविरोधात परिसरातील नागरिकांनी आज महानगरपालिकेवर मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला.
नागरिकांनी सदर टॉवरमुळे आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त करत काम तात्काळ थांबविण्याची मागणी केली.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर महापौर यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली असून महानगरपालिका आयुक्तांना सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच निवासी इमारतीवर सुरू असलेले मोबाईल टॉवर उभारणीचे काम तात्काळ थांबविणे व संबंधित टॉवरसाठी पर्यायी खुल्या जागेचा विचार करून योग्य निर्णय घेण्याबाबत प्रशासनाला आदेशित करण्यात आले आहे.
महापौर सौ.संगिता राजेंद्र खांडेकर यांनी स्पष्ट केले की,नागरिकांच्या आरोग्य,सुरक्षितता व सार्वजनिक हिताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी परिसरातील रहिवाशांच्या वतीने आपली भूमिका मांडली.महानगरपालिका प्रशासनाकडूनही या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.



