Home Maharashtra बेरोजगार फसवणूक “स्कॅम”….  — पांढरपेशांची “शक्कल” व “सहभाग”नाकारता येणार नाही…

बेरोजगार फसवणूक “स्कॅम”….  — पांढरपेशांची “शक्कल” व “सहभाग”नाकारता येणार नाही…

   रोखठोक…

प्रा.महेश पानसे…

         नगर परिषद, पंचायत समिती व महसूल विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार युवक व त्याचे पालकांची लुबाडणूक करणाऱ्या दोन ठगबाजांची मान पोलिसांना अखेर गवसली.

       ‘मामू’ बनलेल्या तिघांनी पोलीस ठाणे गाठून तक्रारी नोंदविल्या,या स्कॅम मध्ये तोंड ओळख झालेले राजू पुड्डटवार व नाना आक्केवार कुप्रसिद्धीच्या झोतात आले.

       दोघेही भामटे ठरले हे जरी खरे असले तरी जनचर्चेनुसार या फसवेगिरीत करोडोंची उलाढाल झाली असल्याचा कयास आहे व यात काही पांढरपेशांची ‘ शक्कल’असल्याची चर्चा आहे. 

        तिघांनी तक्रार केल्याने ५० लाखापर्यंत फसवेगिरीचा आकडा पोलीस चौकशीत आला असल्याचे बोलल्या जात असले तरी हा आकडा करोडो च्या वर असल्याचे व अजूनही फसगत झालेले कितीतरी जण तक्रार करायला पुढे न आल्याची चर्चा घडत आहे.ही ‘अंदर की बात ‘असल्याचे जनचर्चेनुसार संकेत मिळत आहेत. 

            सदर स्कॅम मध्ये मुखवटा राजू पुड्डतवार,नाना आक्केवार यांचा असला तरी या मुखवट्यामागे असलेल्या काही आयडिया बाज स्थानिक राजकारण्यांचे हितसंबध या फसवेगिरीत आहेत का? असेल तर ही मंडळी कोण? याचा छडा लावण्यासाठी मूल पोलिसांना ‘ अॅक्शन मोडवर यावे लागणार आहे. 

       मूल शहरात सुरू असलेल्या गल्लीबोळातील गुटरगू नुसार या पोटभरू राजकारण्यांना उघडे पाडण्यासाठी संशयितांचे बॅंक अकाऊंट व त्यावरील व्यवहार भूमिका पार पाडू शकेल असा जिल्ह्यातील जाणकारांचा अंदाज आहे. 

         कदाचित पोलीस कोठडीत यातील राजकीय ठकबाजांवर चौकशी केंद्रीत केल्यास शहरातील फसवेगिरीची राजकीय घाण बाहेर येईल असे ठामपणे बोलले जात आहे. 

    पुड्डटवार व आक्केवार यांचे मागे या पोटभरू राजकारण्यांचा रोल कसा काय राहू शकतो? हा सवाल उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.शंकेला वाव आहे, व आजमितीस खास करून मूल न.प.अंतर्गत अनेक घोटाळे घडले त्यात अप्रत्यक्षपणे स्थानिक राजकारणी होतेच हे कुणीही नाकारू शकत नाही. विवीध स्कॅम चे गॉडफादर हे छुटभये राजकारणी राहीले आहेत. 

           मूल च्या चुणूक मुटूक राजकारण्यांसाठी मुंबई व मंत्रालय तसाही तोंडातच असतो.भविष्यात लवकरच न.प.निवडणुका होतील.आपलीच सत्ता राहील,जागा भरून टाकू या मानसिकतेचे विद्युत झालेल्या शहरातील काही राजकारण्यांनी पुड्डटवार व आक्केवार यांना बळीचा बकरा बनविला तर नाही अशीही शंका चर्चेत यायला वाव आहे. 

         मूल शहरातील काही राजकारण्यांची ही खासीयत आहे.की लुटमार करायची झाल्यास पक्ष सोडून मंडळी एकत्र येत असल्याचा शहरवासीयांचा अंदाज आहे. 

              पुड्डटवार व आक्केवार याची हजामत तर झालीच आहे. या दोन मुखवट्यामागे असलेल्या त्या बिलंदर राजकारण्यांना वेसन घातले जाते की भविष्यात कारनामे करण्यास मोकळे सोडले जाते.याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले दिसते हे मात्र खरे. 

तो क्रिडा अधिकारी ‘दोषी’ नाही का? 

     बेरोजगार फसवणूक प्रकरणात मामू’ बनलेल्या तिघांनी लुटमार झाल्याची तक्रार पोलीसात केली. 

            या तक्रारकर्त्या तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे वुत्त झळकले आहे. या महाशयांनी 26 लाखाचे वर खंडणी मुलाचे नोकरीसाठी दिली.तशी रितसर तक्रार पोलीसात दिली आहेच. 

         सदर तक्रार कर्ता शासकीय अधिकारी आहे. कायद्यानुसार लाच किंवा खंडणी देणे गुन्हा ठरतो. शाशकीय अधिकारी असूनही भामट्यांना जाणून बुजून 26 लाखाचे वर खंडणी( लाच) देणाऱ्या या अधिकाऱ्यांनी पोलीसात फसवणुकीची तक्रार देऊन स्वताचेपाय दलदलीत घातले तर नाही अशीही चर्चा सूरू आहे. कारण खंडणी देणे व घेणे हे दोन्ही प्रकार बेकायदा ठरतात. 

       आता मुल पोलीस या विषयाकडे कसे बघतात किंवा क्रिडा क्षेत्रातील हायकमान या क्रिडा अधिकाऱ्यांना सहानुभूती म्हणून पाठिशी घालतात हे पुढे कळणारच आहे.