दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर मच्छिंद्रनाथ गुळुंजकर आणि श्रीमती अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असून, नागरिकांमध्ये दोघांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. सामाजिक बांधिलकी, सातत्याने केलेली लोकसेवा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे या जोडीची चर्चा प्रभागभर रंगत आहे.
व्यापारी तरुण मंडळ व माऊली ग्रुपचे अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर गुळुंजकर यांनी अनेक वर्षांपासून आळंदी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा ओळखून त्यांनी सातत्याने मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे श्री दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने व शिवाजीराव मराठे यांच्या सहयोगातून सुमारे २२ लाख रुपयांचा वैकुंठ सेवारथ उपक्रम प्रत्यक्षात आला. कोणतेही पद नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजासाठी काम करण्याची त्यांची तळमळ विशेष दखल घेण्यासारखी आहे.
माऊली ग्रुपच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, वारकरी भाविकांना प्रसाद वाटप, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सज्ज ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
दरम्यान, विविध कार्यकारी सोसायटी आळंदी–केळगाव येथे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती अरुणा घुंडरे यांनी स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. माऊलींच्या रथावरील मानाची बैलजोडी (सन 2025) मिळण्याचा सन्मान त्यांच्या सततच्या समाजसेवेची साक्ष देणारा मानला जातो. कोविड काळात गरजूंना मदत, अन्नधान्य वितरण व तत्पर जनसंपर्क उपक्रमांमुळे त्यांचे कार्य विशेषत्वाने समोर आले.
प्रभाग ७ मध्ये दारोदार संपर्क, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि विकासाचे ठोस आराखडे मांडणे यामुळे दोन्ही उमेदवारांचा प्रचार अधिक व्यापक झाला आहे.



