शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यात चालू आर्थिक वर्षामध्ये अवकाळी पाऊस,अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व शेतमजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.परिणामी गावातील बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असताना सदर प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात पाच डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत लागू केले असून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व थकीत असलेल्या नागरिकांना घर टॅक्स व पाणी पट्टीमध्ये ५०% सवलत मंजूर केली असून 25 ते 26 या वर्षाचा कर पूर्ण भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या योजने मुदत 31 डिसेंबर देण्यात आली असून सुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतीने या योजनेची अंमलबजावणी केलेली नसल्याचे दिसून येत आहे.
चिचाळा कुणबी येथील काही नागरिकांनी ग्रामसेवक यांना याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवकाने याबाबतची नोटीस दिनांक 23 डिसेंबर रोजी सूचना फलकावर लावली.परंतु या योजनेची मुदत अवघ्या पाच दिवसच शिल्लक राहिले.
ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतने जाणीवपूर्वक उशीर केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.एक तर शेतकऱ्यांनी कापूस सीसीआयला विकला असला तरी शेतकऱ्यांच्या हातात अजूनही कापसाचा पैसा मिळालेला नाही.
त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर हे आर्थिक अडचणीत आहेत. तेव्हा या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी आणि ही योजना राबविण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरपंच व सचिवावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिचाळा कुणबी येथील नागरिकांनी केली आहे.



