युवकांना बेरोजगार करण्याचे पाप या सरकारने केलं आहे :-डॉ.अमोल कोल्हे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, युवासेना, युवक काँग्रेस, आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त ‘युवा महाराष्ट्राभिमान मेळावा’ भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यग्रह येथे पार पडला.

         यावेळी महाविकास आघाडी शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे, मेहबूब शेख, आपचे मयूर दौंडकर, काँग्रेसचे शिवराज मोरे, युवासेनेचे विशाल ससाणे या प्रमूख मान्यवरांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.

         यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, देशातील जनतेचा मोदी सरकारने अपेक्षाभंग केला आहे.विशेष करून युवकांना बेरोजगार करण्याचे पाप या सरकारने केलं आहे. जगाचा इतिहास बघितला तर क्रांती तेव्हा घडते जेव्हा युवक मनावर घेतो.देशातील वातावरण बदललेलं आहे केंद्रातील मोदी सरकार यावेळेस जाणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे.ही निवडणूक युवकांच्या अस्तित्वाची आहे. तरुणांनी प्रवाहात असणे गरजेचे आहे.युवकांनी काठावर बसून फक्त टाळ्या वाजवले तर परिवर्तनाचे साक्षीदार होतील परंतु समोर येऊन या लढ्यात सामील झाले तर या परिवर्तनाचे शिलेदार होतील. २०२४ निवडणुकीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महाराष्ट्रातील युवक संविधान वाचवायच्या लढाईमध्ये आघाडीवर होता असा इतिहास लिहिला जाईल. केंद्रातील जुलमी सत्ता बदलण्यासाठी इथला युवक नक्कीच माझी साथ देईल असेही ते म्हणाले.

          यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले, डॉ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्यांमध्ये राहणारा, त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एका शेतकऱ्याच्या मुलाच्या रूपाने उमेदवार लाभला आहे. महाराष्ट्रातील नागरिक गद्दारीला थारा देत नाहीत,महाराष्ट्रतील नागरिक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या लोकनेते शरदचंद्र पवार साहेब, संसदरत्न खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करतील हा विश्वास आहे.

            यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, गेल्या दहा वर्षात दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन युवकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या मोदी सरकारने केल असून युवकांचे मूळ प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी युवकांना धार्मिक मुद्द्यांवर अडकवले जात असल्याची टीका यावेळी केली.२०१३ पूर्वी ५.४ असलेला बेरोजगारी दर २०२४ मध्ये ८.४ झाला असून याला सर्वस्वी भाजप सरकारचे बेलगाम धोरण कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

            स्वप्नील गायकवाड म्हणाले डॉ.अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या शरद पवारांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली. युवकांनी अशा निष्ठावंत उमेदवाराच्या पाठीशी राहिले पाहिजे.