संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीत भक्तीभावाने आगमन… — उद्या हजेरी मारुती मंदिरात दिंडयाची हजेरी होणार…

 

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक

 

आळंदी : टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भक्तिभावाने अलंकापुरी नगरीत दाखल झाली. यावेळी हजारो आळंदीकर ग्रामस्थ, वारकऱ्यांनी फुलांची उधळण करीत माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. थोरल्या पादुकांपासून ते आळंदी पर्यंत पालखी सोहळ्यात हजारो वारकरी आणि नागरीकांनी हरीनामाचा गजर करीत माऊलींचे स्वागत केले.

       भवानी पेठेतील विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांवर प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी पवमान अभिषेक करण्यात आला, सकाळी दहा वाजता माऊलींच्या पालखी रथाचे आळंदी कडे प्रस्थान ठेवले पालखी सोहळा पुणे स्टेशन, येरवडा, फुलेनगर, विश्रांतवाडी, कळस, दिघी, थोरल्या पादुका, धाकट्या पादुका असा प्रवास करत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सायंकाळी सहा वाजता माऊलींच्या मंदिरात आगमन झाले.

         यावेळी विविध ठिकाणी माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले, थोरल्या पादुका मंदिरात तसेच धाकट्या पादुका येथे माऊलींच्या पालखीचे स्वागत विधिवत पूजन करून स्वागत केले यावेळी थोरल्या पादुका मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णू तापकीर व समितीचे सदस्य व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.धाकट्या पादुका येथे संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, दिपक मुंगसे, प्रदीप काळे, श्रीधर घुंडरे व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. आळंदी नगरपरीषदेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 

        नगरपरिषद चौकात पालखी रथातून काढून आळंदीकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन “माऊली माऊली” जयघोषात माऊलींच्या मंदिराकडे पालखीचे प्रस्थान ठेवले, यावेळी पालखीचे चक्रांकीत व गांधी परिवाराच्या वतीने तसेच विष्णू मंदिर, राम मंदिर, कबीर महाराज मठ, हरिहरेंद्र मठात विधीवत पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले महाद्वारातून पालखीचे मंदिरात आगमन झाले मंदिरात प्रदक्षिणा करून पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफाळकर यांनी पादुका हातात घेऊन समाधी मंदिरात समाधी जवळ स्थापित केल्या यावेळी आरती संपन्न झाल्यानंतर मानकरी सेवेकरी यांना आळंदी संस्थांनच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.

        माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाल्यानंतर मानकरी कुऱ्हाडे परिवाराच्या वतीने मंदिरात वारकरी भाविकांना व ग्रामस्थांना साखर वाटप करण्यात आली, तसेच मंदिर परिसरात विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्न प्रसादाचे वाटप करण्यात आले. उद्या एकादशी निमित्त दुपारी बारा वाजता माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा संपन्न होणार आहे तसेच यावेळी हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांची हजेरी होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.