अबोदनगो चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.त्यामुळे गरीब व आदिवासी मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.यामुळे मेळघाटात बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत असले तरी यंत्रणेमध्ये काम करून घेणारे रोजगार सेवक,तांत्रिक अधिकारी यांना सध्या चांगलेच सुगीचे दिवस आले असून दरदिवशी कुठे ना कुठे भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पण पुढे येत आहेत.
असाच प्रकार तेलखार ग्रामपंचायत मधून पुढे आला असून मृत व्यक्तीच्या नावे मजुरी व ज्यांनी कधीच या योजनेत काम केलेले नाहीत अशा लोकांच्या नावे मजुरी काढत असल्याचा प्रकार समोर आला असल्याने याची तक्रार गटविकास अधिकारी चिखलदरा यांना देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय तेलखार मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर शेकडो मजूर काम करतात.पण बाबूलाल बाटु सावलकर रा.तेलखार यांचा मृत्यू 2018 मध्ये झाला असतांना रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांनी 2024 मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल 18 दिवस दाखविले आहे.
त्याची नोंद ऑनलाइन हजेरीपटावर दाखवीत असून बँकेतून खोट्या सह्या करून पैसे काढण्यात आले आहेत.तसेच रोजगार हमी योजनेच्या कामावर गावातील विद्यार्थी,नोकर पेशातील लोकांची नावे दाखविल्या गेली आहेत.
जे लोकं गावात राहत नाहीत अशांची नावे पण रोजगार हमी योजनेच्या कामावर दाखविल्या गेली असून रोजगार सेवकांच्या घरातील मंडळींना कामावर न जाता त्यांच्या नावाने मजुरी काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
या गंभीर प्रकरणाची चौकशी गावातील ग्रामसभेमध्ये सुद्धा मांडण्यात आली होती.पण रोजगार सेवकाने गावातीलच काही लोकांना मद्यपाषाण करून गोधळ घातल्याचा प्रकार ग्रामसभेत घडविल्या गेला आहे.
याबाबतची तक्रार तेलखार गावातील नागरिक अमर ठाकरे, तुळशीराम दिवाकर व भास्करराव ठाकरे यांनी गटविकास अधिकारी श्री.शिवशंकर भारसाकडे यांच्याकडे केली आहे.
आता या गंभीर बाबीवर गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तेलखार गावातील रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्या संगनमताने गावातील मृत व्यक्ती बाबूलाल बाटु सावलकर यांचा 2018 ला मृत्यू झाला होता तरी पण मध्ये त्यांना रोहयो कामावर 2024 मध्ये दाखवून पैसा हडपाण्याचा प्रकार घडला आहे.या गंभीर बाबीची सखोल चौकशी करून रोजगार सेवक व तांत्रिक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गटविकास अधिकारी यांना केली असे अमर ठाकरे यांचे म्हणणे आहे.
रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबत येणाऱ्या 15 मे रोजी पंचायत समिती कार्यालय चिखलदरा येथे सुनावणी ठेवली आहे.चौकशी अंती कार्यवाही करण्यात येईल असे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी सांगितले.


