दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी येथील चऱ्होली रोड, हरिपाठ बाल उद्यान गणपती मंदिर परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलचा तोल जाऊन महिला रस्त्यावर पडल्याने समोरून येणारा पाण्याचा टँकर त्यांच्या डोक्यावरून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात आन्नपूर्ण माणिकराव रोकडे (वय ६३, रा. विकासवाडी, धनोरे फाटा, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना गुरुवारी (दि.१४ मे) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिर चौक, हरिपाठ उद्यानाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलचा अचानक तोल गेल्याने संबंधित महिला खाली पडल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली त्या आल्याने हा गंभीर अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.



