दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी नदी काठावरील महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस व विचारांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.मनोज राका, काँग्रेसचे आळंदी शहराध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, मयुर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, गौरव सदानंद, राजेंद्र नागरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत सत्य, अहिंसा, समता आणि बंधुभाव या गांधीजींच्या मूल्यांची समाजाला अधिक गरज आहे.
गांधी विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, ते आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजात सलोखा, शांतता व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रत्येकाने गांधी विचार आत्मसात करण्याचे आवाहन नंदकुमार वडगावकर यांनी केले.



