दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – शहरातील पीएमपीएमएल बसस्थानक पुणे महापालिका हद्दीतील बस नदीपलीकडे हलवल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. रोजंदारीसाठी बसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थी, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच प्रवासी या बदलामुळे त्रस्त झाले आहेत.
नव्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त अंतर पार करावे लागत असून, सकाळ–संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा त्रास अधिकच जाणवतो. परिसरात सावलीची, प्रकाशयोजनेची आणि सुरक्षिततेची पुरेशी व्यवस्था नसल्याने असुरक्षितता वाढली आहे. पावसाळ्यात तर ही गैरसोय अधिक भीषण होणार, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.
“जुन्या जागी बस मिळत होती तेव्हा वेळ वाचायचा; आता चालण्यातच वेळ जातो. शिवाय रात्रौ महिला व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितताही प्रश्नच आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी बसस्थानक पूर्वीच्या जागी आणावे किंवा नव्या ठिकाणी सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. पीएमपीएमएलकडून मात्र अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया मिळालेली नाही.



