दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, भाजपाचे माजी पदाधिकारी अतुल देशमुख यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चेला आता उधाण आले आहे. या हालचालीमुळे आळंदीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषद निवडणुकीत मागील कार्यकाळात भाजपाच्या सत्तास्थापनेत अतुल देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पक्षातील संघटनात्मक कामकाज, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क आणि विकासकामांतील सहभाग या माध्यमातून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला होता. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा भाजपच्या गोटात चिंतेचा विषय ठरली आहे.
शिवसेना (शिंदे गट) कडून देशमुख यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आळंदीतील शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळेल, अशी शक्यता मान्यवरांनी वर्तवली आहे.
दरम्यान, देशमुख यांनी यांनी सांगितले की “कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय घेण्यात येईल,” असे त्यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव लवकरच पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.



