दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
गडचिरोली २० सप्टेंबर :- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा समितीच्या येथील चांदेकर भवन येथे शुक्रवारी झालेल्या सभेत जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, ज्येष्ठ नेते कुलपती मेश्राम, डॉ.हरिदास नंदेश्वर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, केशवराव सम्रुतवार, विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, शहर महिला अध्यक्षा वनमाला झाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
बैठकीत चर्चा झालेल्या जनतेच्या प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील महामार्ग आणि रस्त्यांची दयनीय अवस्था, जंगली हत्ती आणि वाघांचा उपद्रव, कंत्राटी शिक्षकांचे वेतन, कॉर्पोरेट कंपन्यांकडून मौल्यवान शेतजमिनी जबरदस्तीने खरेदी करणे, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर जबरदस्तीने बसवणे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दुर्गम भागात आरोग्य सुविधा आणि दळणवळणाचा अभाव, शेतकऱ्यांना बोनस देणे, जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबींचा समावेश होता. या समस्या सरकारकडे मांडण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
या समस्यांमुळे जिल्ह्यातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि सरकार आणि प्रशासनाच् समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यात तीव्र असंतोष आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले आणि सरकारने या समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन त्या सोडवण्याची मागणी केली.
या सभेत काही नवीन कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला त्यात जगदीश ढोलणे, नामदेव दुधे, रमेश शेंडे, माणिक राऊत आदींचा समावेश होता. त्यांना पुष्पगुच्छ आणि पक्ष सदस्यत्व देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
सभेस श्री.सुखदेव वासनिक, अरुण भैसारे, नामदेव खोब्रागडे, दादाजी धाकडे, हेमाजी सहारे, चंद्रभान राऊत, नामदेव मेश्राम, तुळशीदास नंदेश्वर, कु.ज्योती चौधरी, नंदा राऊत, गेंदाबाई गोडबोले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा.राजन बोरकर यांनी तर आभार प्रल्हाद रायपुरे यांनी मानले.



