Home Social आजच्या भारतीय राजकारणाच्या संदर्भात डॉ.अनंत राऊत यांची ‘सत्तेच्या मोहाची लाळ’ ही कविता...

आजच्या भारतीय राजकारणाच्या संदर्भात डॉ.अनंत राऊत यांची ‘सत्तेच्या मोहाची लाळ’ ही कविता अत्यंत महत्त्वाची वाटते.:- डॉ.बालाजी पोतुलवार मराठी विभाग,पीपल्स कॉलेज नांदेड ९८२३४४४१०७…

      “सत्तेच्या मोहाची लाळ”,प्रा.अनंत दा.राऊत यांची ही कविता मानवी प्रेमावर नाही,तर सत्तेच्या प्रेमावर आधारित आहे. 

      येथे कवीने सत्तेच्या मोहात आकंठ बुडालेल्या व्यक्तीचे, आणि त्यावर फिदा होणाऱ्या जनतेचे वास्तववादी,व्यंग्यात्मक व निर्भीड चित्रण केले आहे.

      सत्तेच्या लालसेचे रूपक,“सत्तेच्या मोहाची लाळ” हे अत्यंत प्रभावी आहे.सत्तेसाठी झटणारा माणूस आतून अस्वस्थ,वखवखलेला असतो.तत्त्व,नीती,मूल्य यांची तो राजरोस तिलांजली देतो. 

       सत्ता मिळवण्यासाठी कुणीही दिलेले ‘घातकी कोलीत’ तो हातात घेतो.सत्तेवर आल्यावर तो सार्वजनिक तिजोरीवर घाला घालतो,रट्टावून ओरबाडतो,आलिशान जीवन जगतो; पण या प्रक्रियेत तो लोकशाहीची मुळेच उखडून टाकतो. 

        कवीने येथे केवळ सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीवर टीका केलेली नाही,तर मतदारांच्या अंधभक्तीवरही तीक्ष्ण प्रहार केलेला आहे. 

     “असलेच लाळगाळे आज माजलेत अफाट,लोकही बेफाट” या ओळींतून जनतेच्या राजकीय अज्ञानाचा पर्दाफाश होतो. 

       लोक अशा सत्तालालसेच्या नेत्यांवर भुलतात,त्यांनाच मत देतात,आणि नंतर पाच वर्षे त्यांच्याकडेच भीक मागत राहतात,ही लोकशाहीतील खरी शोकांतिका कवीने अधोरेखित केली आहे.

     कवितेची शब्दयोजना अत्यंत टोकदार,लहान ओळींमुळे संदेश झटक्यात पोहोचवणारी आहे.

    “सत्तेच्या मोहाची लाळ”, “अस्वस्थ वखवखलेला जाळ”, “घातकी कोलीत”, “सार्वजनिक तिजोरीवर घाला” 

    अशी रूपके जिवंत प्रतिमा निर्माण करतात. “रट्टावून ओरबाडतो”, “शाही शाही”, “बेफाट” अशा शब्दांतून संताप स्पष्टपणे उमटतो.

       या सर्वामुळे कवितेला थेटपणा,निर्भीडपणा आणि सामाजिक भाष्याची धार प्राप्त होते.आशयाच्या मांडणीत सत्ता,जनता आणि लोकशाही यांचा त्रिकोण स्पष्ट दिसतो. 

      सत्ता टिकवण्यासाठी तत्त्वांचा बळी,जनतेचे अल्पकालीन स्मृतिभ्रंश,आणि लोकशाहीच्या मूळ मूल्यांचा ऱ्हास – हे सर्व आजच्या वास्तवाशी तंतोतंत जुळते.

           आजच्या भारतीय राजकारणाच्या संदर्भात ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षांतर,भ्रष्टाचार,भावनिक व जातीय राजकारण,मतांच्या बदल्यातील सुविधा,आणि निवडणुकीनंतरची जनतेची असहायता – या सर्व गोष्टी कवीच्या शब्दांत जिवंत होतात.

      म्हणूनच ही कविता केवळ साहित्यकृती म्हणूनच नव्हे,तर लोकशाहीतील नागरिक जबाबदारीची जाणीव करून देणारा इशारा म्हणूनही वाचावी लागते. 

      “सत्तेच्या मोहाची लाळ” वाचकाला केवळ सत्तालोलुप नेत्यांवर राग आणत नाही, तर स्वतःच्या राजकीय निर्णयांवर आत्मपरीक्षण करायला भाग पाडते,आणि यामुळेच तिचे साहित्यिक तसेच सामाजिक मूल्य अधिक गडद व प्रभावी ठरते.

ही पूर्ण कविता खालील प्रमाणे….

सत्तेच्या मोहाची लाळ.. 

           प्रा.अनंत दा. राऊत…

ज्याच्या तोंडातून गळत राहते 

सत्तेच्या मोहाची लाळ,

      त्याच्या काळजाला लागलेला असतो अस्वस्थ वखवखलेला जाळ…. 

      तत्त्व स्वत्व नीती मूल्यांना 

राजरोस घालतो तो चुलीत,

     सत्तेसाठी घेतो मग हातात 

कुणीही दिलेलं घातकी कोलीत….

   फलित मिळतं सत्तेचं त्याला 

सार्वजनिक तिजोरीवर 

घालतो मग घाला, 

       रट्टावून ओरबाडतो 

सारं सारं काही 

जगायला लागतो मग 

जीवन शाही शाही 

पण मारून टाकत असतो तो 

मूल्य लोकशाही…‌

     असलेच लाळगाळे आज 

माजलेत अफाट,लोकही बेफाट,

       त्यांच्यावरच भुलतात

त्यांच्याच तिजोरीत 

मतधन टाकून 

त्यांच्याकडेच पाच वर्षे 

भीक मागत राहतात….

*****

    (दखल न्यूज भारत वेब पोर्टल च्या वृत्त संपादीका दिक्षा कऱ्हाडे यांनी सदर कविता व कविती अंतर्गत मनोगत प्रकाशित केले आहे..)