दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
गडचिरोली – गडचिरोली येथील विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेती बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुरखडा यथे सुरु करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांनी शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन हा पाठिंबा जाही केला. विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादक जमिनी अधिग्रहित करणे अजिबात चुकीचे व अन्यायकारक आहे. या निर्णयाने मुरखडा, पुलखाल, कनेरी,मुडझा इत्यादी गावातील साडेतीनशे हून अधिक शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्या जाणार आहे. तेंव्हा शासनाने जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा व विमानतळासाठी पर्यायी जागा शोधावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
आपला पक्ष नेहमी शेतकरी, शेतमजूर कष्टकरी लोकांच्या बाजूने उभा राहिलेला आहे व या आंदोलनात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसोबत ताकतीने उभे राहू असे रोहिदास राऊत यांनी म्हटले आहे.
या भेटीच्या वेळी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम, विलास निंबोरकर, हरिदास कोटरंगे, शेतकरी नेते शरद पाटील ब्राह्मणवाडे, योगेश सोनुले, प्रभाकर वाडपल्लीवार व विमानतळ ग्रस्त अनेक शेतकरी उपस्थित होते.



