Home Political ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वेध… — राजकीय पुढारी लागले...

ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वेध… — राजकीय पुढारी लागले कामाला…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

         स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधीच लांबलेल्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहेत. या निवडणुका आता दिवाळीच्या काळात होतील, अशी शक्यता आहे. मात्र ग्रामीणभागातील जनतेला निवडणुकीची प्रतिक्षा असुन निवडणुका कधीही जाहीर होवू शकतात, अशी आशा स्थानिक राजकीय नेत्यांना असल्याने राजकीय पुढारी कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

       जिल्हा परिषद, पंचायत समितीची मुदत संपल्याने ग्रामीण भागातील पुढारी व संभाव्य उमेदवार मतदार राजा जनतेशी संपर्क साधत आहेत. लग्न सोहळा, वाढदिवस, नवस आदी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत चर्चा करत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवार मीच असा प्रचार करत आहेत.

        तसेच काही भावी उमेदवार आगामी निवडणूक लक्षात घेता नागरिकांचे काही अडले नडले कामे करून देण्यावर भर देत आहेत. तर काही मुरब्बी राजकारणी आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करल्यावर काँग्रेस यासह इतर पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सक्रीय होत पक्ष संघटन, बांधणी आदीबाबत बैठका घेत आहेत.

         आठ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती गणात निवडणुकीची चर्चा सुरू असून मागील पाच वर्षांत मतदार संघात फिरकूनही न पाहिलेल्या सदस्यांनीही पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी तयारी दाखविण्याचे दिसून येत आहे. अशातच नव्या उमेदवाराला मतदारांची पसंती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महायुती, महाविकास आघाडी यांच्यात लढत होईल की प्रत्येक पक्ष निवडणूक लढवणार याची उत्सुकता ग्रामीण भागातील जनतेला लागलेली आहे.