Home Maharashtra धान बोनसच्या प्रतीक्षेत शेतकरी,शासनाच्या निर्णयाकडे लागल्या नजरा…. — शासनाने तातडीने धान...

धान बोनसच्या प्रतीक्षेत शेतकरी,शासनाच्या निर्णयाकडे लागल्या नजरा…. — शासनाने तातडीने धान बोनस जाहीर करावा :- उपसरपंच अशोक चौधरी…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

       चिमूर तालुक्यासह परिसरातील हजारो धान उत्पादक शेतकरी शासनाकडून जाहीर होणाऱ्या धान बोनसच्या प्रतीक्षेत असून,अद्याप बोनसबाबत कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

        वाढत्या महागाईमुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला असून धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे शासनाने तातडीने धान बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी जोर धरत आहे.

         धान हे विदर्भातील प्रमुख पीक असून अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे.मात्र यावर्षी खत,बियाणे,औषध फवारणी,मजुरी व इतर शेती साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

         त्यातच नैसर्गिक संकटे,अवकाळी पाऊस तसेच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली असून आता त्यांना बोनसच्या माध्यमातून आर्थिक आधाराची अपेक्षा आहे.

        शेतकऱ्यांनी हमीभावाने धान विक्री केली असली तरी बोनसची रक्कम मिळाल्यास पुढील हंगामासाठी बियाणे, खत व इतर शेती साहित्य खरेदी करण्यास मोठी मदत होणार आहे. 

         मात्र बोनस जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी संभ्रमात असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

         यासंदर्भात शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की,“धान उत्पादक शेतकरी आज गंभीर आर्थिक संकटातून जात आहे.आता पुढील हंगामाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे नागरणी,शेणखत वाहतूक,तसेच शेतीपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. 

        त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.शासनाने कोणताही विलंब न करता धान बोनस जाहीर करून बोनसची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

        तसेच बोनस वितरणात दिरंगाई झाल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते.संबंधित विभागाने धान बोनस वितरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रक्रिया जलदगतीने सुरू करावी,अशी मागणीही उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.