उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालूक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन सुरू असून या अवैध वाळू उत्खननाकडे चिमूर तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सध्यातरी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.
मौजा सावरगाव ते मौजा मालेवाडा मार्गाने मौजा जांभुळघाटकडे आज सकाळलाच अवैध रेतीचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात मार्गक्रमण करीत असल्याचे दिसून आले.
तहसीलदार श्रिधर राजमाने आणि महसुल विभागाचे भरारी पथक आता थकले असून त्यांना विश्रांतीची गरज आहे काय? असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात रेतीतस्करांची संख्या असल्याने संपुर्ण तालूक्यात अवैध रेतीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे.
मोठ्या रेती तस्करांकडे पाच ते दहा ट्रॅक्टर उपल्बध असल्याने एका ट्रॅक्टरवर कार्यवाही झाली तरी इतर ट्रॅक्टरानी ते रेतीची तस्करी करीत असतात.
महसुल विभागा कडून काही अवैध रेतीच्या ठिकाणी नाल्या खोदून रस्ते अडवण्यात आले,पण चोरांना दहा रस्ते असतात हे लक्षात घेतले तर नायब तहसीलदार,तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक नेहमी तत्पर ठेवणे आवश्यक आहे.
महसुल विभागाचे भरारी पथक शांत झाले कि शांत करण्यात आले हे तहसीलदार श्रिधर राजमाने यांनाच माहिती.
चिमूर तालुक्यातील नागरिकांचा आरोप आहे की,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बरोबर रेती तस्करांची सेटींग असल्याने वाळू उत्खननाबाबतचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
त्यामुळे दिवसेंदिवस वाळू तस्करांची हिम्मत वाढत असल्याचे दिसुन येत आहे.अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर महसुल विभागा कडून कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची रास्त मागणी आहे.



