तालुक्यातील जि.प प्राथमिक शाळा कोचीला शालेय साहित्य वितरण…. — तहसिलदार आणि ठाणेदारांकडून पत्रकार बांधवाचे कौतुक… — लेखनी सोबतच सामाजिक समस्यांची दखल घेतली :- अनिकेत सोनवणे तहसीलदार…

 

उमेश कांबळे

ता प्र भद्रावती :

        जिल्हा परिषद शाळा वाचवून शिक्षण व्यवस्था कायम ठेवावी यासाठी समाजाने जागृत राहून, प्रसंगी सर्व स्तरातून संघर्ष करण्याची तयारी ठेवली तरच आपल्या बालकांना शिक्षण मिळेल. शिक्षण बचाव करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोची तालुका भद्रावती येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, पुस्तके भेट व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

       शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष मनीपुष्प मालेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रमुख अतिथी अनिकेत सोनवणे, तहसीलदार भद्रावती, बिपीन इंगळे , ठाणेदार भद्रावती, निलेश ठाकरे सचिव, पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, नरेंद्र सोनारकर विदर्भ संघटक, पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, मानकर साहेब समाजसेवक चंद्रपूर, प्रवीण चिमूरकर अध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती, सचिव , डॉ. ज्ञानेश हटवार पत्रकार संघ भद्रावती, रविंद्र तिराणीक, सरपंच, सचिव, पोलिस पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

          शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षण बचाव मोहिमेअंतर्गत पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती द्वारा साहित्य वितरण कार्यक्रमात अनिकेत सोनवणे तहसीलदार यांनी मार्गदर्शन करताना “विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच पालकांची आहे” असे ते म्हणाले. ठाणेदार बिपिन इंगळे यांनी ‘जिल्हा परिषद शाळेतूनच मोठे अधिकारी तयार झाले आहेत. हा आदर्श लक्षात घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिले पाहिजे’ असे सांगितले.

         पुरोगामी पत्रकार संघ हा लेखणीसोबतच अन्यायकारक धोरणाच्या विरोधात समाजासोबत विधायक कार्यात कायम असतो. जिल्हा परिषद शाळा वाचवा हे ब्रीद घेऊन पुरोगामी पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात निवेदन देऊन ते शासनापर्यंत पोहोचवेल असी ग्वाही निलेश ठाकरे यांनी दिली. तर मार्गदर्शन करताना नरेंद्र सोनारकर यांनी शिक्षण हा हक्क आहे, तो प्रत्येकाला प्राप्त झालाच पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद शाळा जिवंत राहिलीच पाहिजे, यासाठीच्या संघर्षात समाजासोबतच पुरोगामी पत्रकार संघ आहे असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळा कायम राहावी असा ठराव ग्रामपंचायत मार्फत घेतला जाईल व तो शासनाला पाठवला जाईल असे सरपंच महोदयांनी सांगितले. 

         उपस्थित अधिकारी वर्गाला मुलांनी प्रश्न विचारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, लेखन साहित्य व शाळेला पुस्तक भेट प्रदान करण्यात आले. अंबुजा फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाला झाडे पुरविण्यात आली. शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीचे ध्येय, भूमिका व कार्य डॉ ज्ञानेश हटवार यांनी विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंचोलकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती चे मनोज मोडक, शिरीष उगे, आशिष कोटकर, हर्षल रामटेके, उमेश कांबळे, ग्रामपंची़त सदस्या कविता क्षिरसागर, पोलीस पाटील, मनिषा आसमपल्लीवार, संतोष क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले. गावकरी व विद्यार्थ्यी कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित होते.