तरुणांनी लेखनातून नवे झरे प्रगटावेत.:-डॉ.कुमार सप्तर्षी… — संग्राम शेवाळे लिखित ‘लंडन सफरनामा’ पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

पुणे : संग्राम नाथाभाऊ शेवाळे लिखित ‘लंडन सफरनामा’ पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर येथे युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी, आमदार अशोक पवार, न्या.बी.जे.कोळसे-पाटील, कृष्णनामदास महाराज, पांडुरंग बलकवडे, माजी आमदार पोपटराव गावडे, विलास लांडे, एन.आर.प्रवीण, तृप्ती देसाई, रमेश देवकर, उपायुक्त जाधव, गणेश महाराज शिंदे या मान्यवरांचे हस्ते झाले.

             पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कार्यक्रम स्थळी येवून शुभेच्छा दिल्या. जनता दलाच्या नेत्या सुशीला मोराळे ,ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे, विद्या ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निलेश पडवळ यांनी सूत्र संचालन केले. जनता दल(सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, वल्लभ सोळस्कर, ऋषिकेश सोळस्कर यांनी स्वागत केले. डॉ.भावार्थ देखणे यांनी आभार मानले.

             यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘आयुष्यातील अनुभव लिहीत गेले पाहिजेत. अन्य देश पुढे गेले त्याचे कारण सर्वांना लिहिण्याची मुभा होती. तरुणांनी लेखनातून जिवंत झरे उमटले पाहिजेत. नवे नवे अनुभव पुस्तकातून समाजापुढे आले पाहिजे. अन्यथा समाज त्याच त्याच विचाराभोवती घाण्यासारखे फिरत राहतो. तरुण पिढीला राजकारणाचा आकर्षण असले तरी अभ्यास असणे महत्वाचे असते. नव्या पिढीने राजकारणात येताना संघर्षाची तयारी ठेवावी. फक्त ट्रोलिंगने राजकारण होत नाही. वॉर रुमचे, द्वेषाचे राजकारण हे शाश्वत नाही, ते टिकणार नाही. राजकारणात निर्लज्जपणा वाढत आहे. घरातील ज्येष्ठांना तुम्ही निवृत्त का होत नाही, हे उद्दामपणे जाहीरपणे विचारले जात आहे.

             बी.जी.कोळसे पाटील म्हणाले, ‘तडजोड न करता केलेल्या कामाची किंमत करता येत नाही. राजकारणात उच्च पदावरील व्यक्ती समाधानी असतातच असे नाही. युवकांनी तत्व न सोडता कार्यरत राहावे.

पुस्तक आणि लेखकाबद्दल

         संग्राम शेवाळे हे लंडन येथे कायद्याचे (LLM) उच्च शिक्षण घेत असताना तेथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, पर्यावरण, आर्थिक, आदी विषयाबाबत आलेल्या अनुभवांचे वर्णन ‘लंडन सफरनामा” या पुस्तकात केले आहे. लंडन व भारताचे गेले अनेक वर्षांचे नाते असून याबाबतचा संपूर्ण इतिहासाचा उल्लेख या पुस्तकात केला आहे, तसेच परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या शासनाच्या विविध योजनाची माहिती या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक ठरणार आहे.

         या “लंडन सफरनामा” हे पुस्तक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक, ऐतिहासिक कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात काम करणान्या नागरिकांसाठी व परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास संग्राम शेवाळे यांनी बोलताना व्यक्त केला.