कर्नाटकात ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार : नाना पटोले

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाची अवस्था मात्र याउलट असून कर्नाटकात त्यांची अवस्था नॅनो कार मध्ये बसावे लागेल अशी होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

           काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने त्यांनी केरला स्टोरी चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु भाजपाच्या अशा कोणत्याच भुलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. काश्मीर फाईल्स चित्रपटाचे भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केले. ते सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले आहेत. मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता आहे पण तेथे दोन जनसमुदायात मोठा संघर्ष पेटला आहे. मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री मात्र कर्नाटकात मताचा जोगवा मागत फिरत आहेत. भाजपाने बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न केला पण भाजपाचा तो मुद्दाही कर्नाटकात चालला नाही. बजरंग बलीचा आशिर्वाद काँग्रेसबरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार आहे, त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपावर येणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार आहे. 

             भारतीय जनता पक्ष खोटारडा पक्ष असून ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील विधानसभा निवडणुक निकालानंतर कर्नाटमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मध्यप्रदेश मध्येही काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. परंतु जनतेचा कौल भाजपा मान्य करत नाही, त्यांच्याजवळ सीबीआय, ईडी सारख्या सरकारी यंत्रणा आहेत. या सरकारी यंत्रणांचा मोदी सरकार सत्तेसाठी दुरुपयोग करत असते हे देशातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खरेदी करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. कर्नाटकात मात्र यावेळी भाजपाच्या ४० टक्के कमीशनवाल्या सरकारला घरी बसवण्याचा निर्णय कर्नाटकच्या जनतेने घेतल्याचे दिसत आहे.

     पृथ्वीराज चव्हाण हे काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते…

          राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. कोणाच्या पक्षात काय चालले आहे हे पहाणे आमचे काम नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.