रोखठोक…
प्रा.महेश पानसे…
मूल शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या सा. बा. विभागाने एकतर वाऱ्यावर सोडले किंवा या महामार्गाने मूल च्या जनतेला अपघातमुक्तीचा वरदान दिला अशी कोपरखडी मारताना शहरात सारेच दिसतात.
कारणही तसेच आहे एरव्ही अपघातश्रवण स्थळ (ब्लॅक स्पाट) शोधण्यासाठी जिवाचे रान करणारी यंत्रणा ज्यात पोलीस, नगर परिषद, खुद सा. बा. विभाग व सारीच वाहतुक सुरक्षा यंत्रणेला मूलशहरातील हे स्पाट मात्र अजिबात दिसत नाहीत का? किंवा कुणाचा जीव गेल्यावरच यांची नजर खुलेल हे कळायला जनतेला वाव दिसत नाही.
मूल शहरातून धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कमालीची व अहोरात्र वर्दळ असते. यातच यामहामार्गावरून अनेक वर्दळीचे पोचमार्ग शहराचे विवीध भागात घुसतात.
काही ठिकाणी मंदिर, शाळा, शासकीय कार्यालये, उपजिल्हा रूग्णालय, कॉन्हवेंट, शाळांना महामार्गावरील दुभाजकांना पार करून गवसणी घालावी लागते.
मात्र गांधी चौक व बसस्थानक वगळता कुठेही सक्षम ‘ब्रेकर’ लावण्याची तसदी कुणीही घेतलेली दिसत नाही. या सर्व ठिकाणी कधी ना कधी वाहन धारकांचे हातपाय, डोके फुटले आहेत.
अनेक मुक्या जनावरांना जीव गमवावा लागला आहे. शहरवासीयांना निरंतर या सर्व ठिकाणी ब्रेकरची मागणी करीत असतात. मात्र यंत्रणेला देणेघेणे दिसत नसल्याने आता जीव गेल्यावरच जाग येईल काय? हा संतापजनक सवाल उपस्थित होताना दिसतो.
*****
विशेष म्हणजे जिल्ह्यातील जेष्ट खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची रस्ते सुरक्षा समिती असते. ज्याचे आर. टी. ओ. हे सचिव तरजिल्ह्यातील सारे आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, सा. बा. विभाग अधिकारी पदाधिकारी व सदस्य असतात. ही शासनाची समिती आहे.
सारेच या महामार्गावर ये जा करतात मात्र कुणाच्याही लक्षात ही बाब येऊ नये ही बाब जनतेला कपाळ टोकाला लावणारी दिसते.
*****
सकाळी ६ ते रात्रो ९पावेतो शहरवासीयांना, विद्यार्थ्यांना, रूग्णांना, मंदिरात जाताना शेकडो भक्तांना व अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांना या राष्ट्रीय महामार्गाला ओलांडावे लागते. जेव्हा की महामार्गावरून सतत मोठया वाहनांची बेधडक वाहतूक दिवसरात्र सुरू असते. अशा स्थितीत महामार्ग ओलांडण्याची कल्पना करता येत नसताना जिवावरउदार होऊन महामार्ग पार करावाच लागतो.
नाही म्हणायला काही वर्षांआधी इंग्लंड स्टाईल नाजूक, देखणे, अतिशय महागडे ब्रेकर लावण्यात आले जे पंधरा दिवसातच कुचकामी होऊन भंगारात गेले.
तेव्हापासून शहरातून जाणारा हा महामार्ग अनेक ठिकाणी ‘ब्रेकर’ ची मागणी करीत आहे.
विशेषतः दुर्गा मंदीर परिसर, उपजिल्हा रूग्णालय पोचमार्ग, बाजार समिती रोड, न्यायालय, तहसिल, पंचायत समिती परिसर या ठिकाणी काँक्रिटचे मजबूत ब्रेकर अनिवार्य आहेत.
पोलीस विभाग, नगर परिषदेने ही गंभीर बाब लक्षात घेऊन पाठपुरावा करावा व स्वतः सा.बा.विभागाने या महामार्गावर सुरक्षीत वाहतुकीसाठी प्राधान्याने आवश्यक तिथे त्वरित मजबूत ब्रेकर बांधावेत अशी वारंवार सुरू असलेली जनतेची मागणी नजरेआड करण्याचे पातक करू नये ही रस्ते सुरक्षा समितीची अपेक्षा आहेच.



