शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी शासनाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका करत,रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम उपलब्ध नसल्यास जॉब कार्ड धारकांना प्रतिमाह किमान ६ हजार रुपये मानधन देण्याची आक्रमक मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील मजूर वर्ग आजही कामाच्या प्रतीक्षेत असून,शासनाच्या अपयशी नियोजनामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.रोजगार हमी योजना ही गरीबांची जीवनरेषा असताना,प्रत्यक्षात कामे बंद असल्यामुळे ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप श्री.अशोक चौधरी यांनी केला.
मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे….
१)रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवसांचा रोजगार देण्याची हमी असूनही,अनेक जॉब कार्ड धारकांना काम मिळत नाही.
२) काम न दिल्यास बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे,मात्र शासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
३) महागाईने कळस गाठला असून, हाताला काम नसल्याने मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
३) स्थानिक रोजगाराच्या अभावामुळे ग्रामीण नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.
४) ही शासनाची मोठी अपयशाची पावती आहे.
एकतर काम द्या,नाहितर दरमहा ६ रुपये द्या,ही आता जॉब कार्ड धारकांची तीव्र व रास्त मागणी आहे.
श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर शासनाने तात्काळ या मागणीवर निर्णय घेतला नाही,तर ग्रामस्थ व मजूर वर्गाला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे स्पष्ट केले आहे.
शासनाने केवळ घोषणा न करता तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा काम नसल्यास जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर दरमहा ६ हजार रुपये मानधन जमा करण्याचा निर्णय घ्यावा,अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
ग्रामीण गरीब,शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी ही लढाई अधिक तीव्र करण्यात येईल,असा निर्धार उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केला आहे.



