प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस,वंचित बहुजन आघाडी व इतर समविचारी पक्षांच्या वतीने आज संविधान चौक,नागपुर येथे आरएसएस मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत उपस्थित राहून मोर्चाला आलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे,हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे.एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे.
पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो,असे मोदी सांगत असतात.रा.स्व.संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो,त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अँड.प्रकाश आंबेडकरांनी आपल्या घनाघात मार्गदर्शनातून केली.
या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे संविधान व तिरंगा झेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणार होतो.पण सरसंघचालक मोहन भागत हे मोर्चाला व संविधानाला घाबरून दिल्लीला निघून गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी निवृत्ती घ्यावी असे बौद्धिक मार्गदर्शन त्यांना देण्यात आले,पण मोदींने ते मानले नाही.याचा अर्थ नरेंद्र मोदी संघाला घाबरत नाहीत,ते सैराट झाले आहेत.संघात नैतिकता राहिलेली नाही हे यातून दिसत आहे.
भाजपा व संघाला देशातून संविधान संपवून बंच ऑफ थॉट लादायचे आहे.संघ व भाजपाला संविधान मान्य नाही.सर्व यंत्रणा सरकारने खिशात घातल्या आहेत.भाजपा व संघाला मनुवादी,हुकूमशाही व्यवस्था आणायची आहे.हा देश अदानी-अंबानीच्या हाती द्यायचा डाव आहे.
या मोर्चाने घाबरलेल्या भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने पोलिसांना पुढे करून मोर्चाला परवानगी नाकारून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
पण हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संघ मुख्यालय परिसरात धडकले व लोकशाहीचा आवाज बुलंद केला.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा भाजपा व रा.स्वं.संघांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी वंचित बहूजन आघाडीचे नेते श्री.हर्षवर्धन पुंडकर,नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री.विकास ठाकरे, आमदार साजिद खान पठाण,माजी मंत्री अनिस अहमद,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री.सुरेश भोयर,श्री.अतुल कोटेचा यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



