रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :-
वनवणवा प्रतिबंधक उपाययोजना तसेच मानव-वन्यप्राणी संघर्षासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वन विभाग चिमूर यांच्या वतीने चिमूर येथे एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नागरिकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या एकदिवसीय कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर तर प्रमुख पाहुणे अमोद गोरकार मंचावर उपस्थित होते.कार्यशाळेत जंगलांचे संरक्षण, वनवणव्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, वन्यप्राण्यांचे संरक्षण तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच उन्हाळ्याच्या काळात होणाऱ्या वनवणव्यांना नागरिकांनीच प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत “वनवणवा लागू न देणे ही केवळ वन विभागाची नव्हे तर समाजातील प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय जंगलांचे संरक्षण शक्य नाही,” असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी केले. तर वन्य प्राणीप्रेमी अमोद गौरकर यांनी वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी खबरदारी,माहिती आणि संयम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन यु.बी.लोखंडे यांनी केले, तर ए.ई.नेवारे यांनी आभार मानले. कार्यशाळेस नागरिक, शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



