Home Social “बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” :- दत्ता डोहे यांचे प्रतिपादन…

“बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे” :- दत्ता डोहे यांचे प्रतिपादन…

रोहन आदेवार 

जिल्हा प्रतिनिधी 

मारेगाव :- तालुक्यातील देवाळा येथे आयोजित एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात विचारवंत, लेखक व प्रकाशक दत्ता डोहे यांनी मनुवादी व्यवस्थेवर तीव्र टीका करत समाज प्रबोधनाचे आवाहन केले.

        “देशामध्ये सध्या मनुवादी विचारसरणीने थैमान घातले आहे. सत्तेचा गैरवापर करून अनेक जाती, धर्म, संप्रदाय आणि ग्रामीण घटकांचे शोषण होत आहे. अगदी देशाच्या मा. सरन्यायाधीशांचा अपमान करण्यापर्यंत ही व्यवस्था पोहोचली आहे. ज्यांनी मानवतेसाठी कार्य केले, त्या महामानवांचा छळ करणाऱ्या विचारसरणीने आजही असहिष्णुता वाढवली आहे,” असे ते म्हणाले.

        ते पुढे म्हणाले, “या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे समाज प्रबोधन. बुद्धांनी दाखवलेला मार्ग शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. आपणही त्याच मार्गाने समाज प्रबोधन करायला हवे.

       ‘सूर्य होता आले नाही, तरी सूर्यफूल व्हावे. मस्तक त्याच्याकडे असावे, त्याच्या आलोकात पहावे.

         बुद्ध होता आले नाही, तरी बुद्धफूल व्हावे. हृदय त्याच्याकडे असावे, त्याच्या स्फूर्तीने जगावे.’”

          कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डी. एस. खोब्रागडे (नागपूर), राजूभाऊ निमसटकर, मा. डी. डी. गोंदाने (नागपूर) आणि जगदीश भगत (कर सहाय्यक, चंद्रपूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेशजी भगत यांनी केले, तर समस्त गावकरी देवळा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

         धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून समाजात बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.