दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत नगरी आळंदीमध्ये सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाला काल भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभले. देवी भक्तांच्या उत्साहात भर घालत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पद्मावती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाली. या आगमनामुळे नवरात्रोत्सवाचा उत्सव सोहळा अधिकच भव्य झाला.
पालखीचे आगमन होताच परिसरात ज्ञानोबा-तुकाराम या गजरांनी दुमदुमून गेला. भक्तांनी फुलांचा वर्षाव करून आणि हरिनामाच्या गजरात पालखीचे स्वागत केले. सजवलेल्या पालखीतून माऊलींच्या पादुका देवीच्या गाभाऱ्यात नेण्यात आल्या आणि देवी पद्मावतीच्या पायथ्याशी ठेवून पूजन-अर्चन करण्यात आले.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.रोहीणी पवार, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळामालक ऋषिकेश पवार, मानकरी राहुल चिताळकर पाटील, प्रतिक कुऱ्हाडे, सुरज आरु, राजाभाऊ चोपदार, राजाभाऊ चौधरी, संतोष मोझे, संजय घुंडरे पाटील, सचिन रानवडे पद्मराज रानवडे, पांडुरंग रानवडे, सुनिल रानवडे तसेच वारकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पद्मावती देवीच्या दर्शनानंतर माऊलींची पालखी विश्रांतवड येथे विसावा घेऊन पालखी सोहळा मोहनराव भोसले यांच्या पाडळीवर विश्रांती साठी थांबली नंतर पालखीसोहळा प्रथमच काळभैरवनाथ मंदीरात जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आगमन झाले.
चावडी चौक मार्गी पालखी सोहळा सायंकाळी ८ वाजता पालखीचे माऊली मंदिरात आगमन झाले आरती झाल्यानंतर मानकरी व सेवेकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आले.
पालखी उत्सवाच्या निमित्ताने पद्मावती मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. नवरात्रोत्सवात माऊलींच्या पालखीचे आगमन हे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय ठरले.



