दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
गडचिरोली जिल्हयातील शेतकरी विविध समस्यांने ग्रासले असुन त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आज दुपारी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने गडचिरोलीचे निवासे उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची भेट घेवुन त्यांना या समस्यांबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.
सरकारने जाहिर केल्याप्रमाणे शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस त्वरीत अदा करण्यात यावा, शेतकऱ्यांना रासायनिक खते वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावा.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे रोवणी केलेले धानपीक तसेच पर्हे वाहुन गेले व सडल्या गेले. अशा शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ देण्यात यावा.शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांसाठी बळजबरीने अधिग्रहीत करण्यात येऊ नयेत.
60 वर्षांवरील शेतकरी शेतमजुर यांना दरमहा किमान 10 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व हत्ती तसेच अन्य जंगली प्राण्यांनी नुकसान केलेल्या शेतपिकाची ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
शेतीकाम करतांना नैसर्गिक आपत्ती अथवा सर्पदंश इत्यादी कारणाने मृत पावलेल्या शेतकऱ्यांना व मजुरांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतशिवारातून जाणाऱ्या पांदण रस्त्यांचे खड्किरण करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, जिल्हा सचिव कैलास रायपुरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, जिल्हा संघटक हेमंत सहारे, जेष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, महिला आघाडी शहर अध्यक्षा वनमाला झाडे, शहर उपाध्यक्षा कल्पना रामटेके, जेष्ठ कार्यकर्ते नरेंद्र उंदिरवाडे, भरत जांभुळकर व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.



