शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चंद्रभागा ‘गटारगंगा’ बनलीय… — ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाचे तीनतेरा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पंढरपूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रभागेची अत्यंत दयनीय अवस्था बनली असून शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चंद्रभागा ‘गटारगंगा’ बनलीय, तर वाळवंटाचा उकिरडा बनू लागला आहे

            विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढं महत्व आहे, चंद्रभागेच्या स्नानाला देखील तेवढंच महत्त्व आहे. मात्र या चंद्रभागेची अवस्था दयनीय झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये पंढरपूर येथे येऊन ‘नमामि चंद्रभागा’ (Namami Chandrabhaga) प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प कागदावरच राहिल्याने चंद्रभागेच्या दुरवस्था झाली आहे. 

चंद्रभागा बनलीय गटारगंगा तर वाळवंट झाले उकिरडा

           चंद्रभागा सफाईसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून खर्च केला जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र, वारकऱ्यांच्या नशिबी दुर्गंधी असलेल्या पाण्यात स्नान आणि घाणीने भरलेल्या वाळवंटात भजन करण्याची वेळ येत आहे. बेकायदा वाळू उपशामुळे आधीच वाळवंट उजाड बनलं असताना आता त्याचा उकिरडा होऊ लागला आहे. दिवसेंदिवस चंद्रभागेची अवस्था अधिक वाईट होत आहे आणि प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त 

          माणसाच्या मृत्यूनंतर होणारे दशक्रिया विधी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात व्हावा म्हणून देशभरातून मयताच्या नातेवाईकांची इथे मोठी गर्दी असते. दशक्रिया विधी नंतर केस, ब्लेडची पाने, कपडे तसेच पिंडदान केलेले भाताचे गोळे असेच उड्यावरती वाळवंटात पडलेले दिसतात. मृतांच्या अस्थी, कपडे , वस्तू चंद्रभागेत सोडून दिले जात असल्याने चंद्रभागा अजून प्रदूषित होत आहे. चंद्रभागेत दशक्रिया विधी करण्याची भावना असली तरी यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने भाविक संतप्त आहेत.

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी योजना राबवण्याची मागणी

           पंढरपूरसाठी करोडो रुपयाच्या योजनांच्या घोषणा होत असताना याची पूर्तता करणेही गरजेचे असून विकासकामे करताना भाविकांच्या गरजेचा विचार केला तर असे प्रश्न तयार होणार नाही. किमान आता तरी चंद्रभागेच्या स्वच्छ पात्र आणि सुंदर वाळवंट देण्यासाठी एखादी योजना बनविण्याची मागणी करीत असून तोपर्यंत शासनाने रोज चंद्रभागा सफाईचे आदेश द्यावेत अशी भाविकांची माफक अपेक्षा आहे. 

‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाचे तीनतेरा

            विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकरी संतप्त आहेत..

             याच घाण पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच घाण पाणी तोंडात घ्यावे लागत असल्याने विठ्ठल भक्त निराश होत आहेत. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारण 120 गावे आहेत ज्याचे सांडपाणी नदीत मिसळते.

             या नदीकाठच्या काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी या 120 गावात स्वच्छ भारतमिशन योजनेतून शोष खड्डे , सांड पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामे ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आली होती, मात्र, या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद केव्हा घेता येईल असा, सवाल वारकरी उपस्थित करत आहे.