विद्यार्थी आणि गावकरी जीव मुठीत घेऊन ओलांडतात महामार्ग…. — धारगांव ग्राम विकास समितीच्या शिष्टमंडळाने घेतली केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट….

प्रितम जनबंधु

      संपादक 

                 महामार्ग हे आधुनिक जीवन तसेच दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता असतात परंतु हेच महामार्ग जर यमाचे द्वार म्हणून जीवघेणे ठरत असतील तर काय म्हणावे?       

          अशाच प्रकारची प्रचिती मुंबई-कोलकाता महामार्गावर भंडारा तालुक्यातील धारगाव येथे अनुभवास मिळते आहे. धारगाव येथे आवागमन करण्याकरीता यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग निर्मिती करतांना बोगदा देण्यात आला होता मात्र तो योग्य ठिकाणी न घेता गावाच्या एका टोकाला देण्यात आला आहे. 

             गावाच्या दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग ओलांडून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सामान्य रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत, दूध संकलन केंद्र, सरकारी धान्य गोडाऊन, बस स्थानक इत्यादी अतिआवश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. 

                करीता धारगाव येथे उड्डाण पुल देण्याच्या सबंधाने धारगाव ग्राम विकास समितीच्या शिस्टमंडळाने केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या निवास्थानी भेट घेतली. गडकरी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

           याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रवीण नावरे, बाल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुण नावरे, सचिव मारोती गिऱ्हेपुंजे, युवा चळवळीचे प्रमुख दिनेश वंजारी, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गिऱ्हेपुंजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

      जीव धोक्यात टाकून महामार्ग ओलांडताना विद्यार्थी 

               शाळेत जातांना व शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. अलीकडे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. अनेक गावांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. 

             यासाठी धारगाव या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा, यासाठी स्थानिकांनी मागणी केली आहे.