कृषी विभागास तक्रारकर्त्या समक्ष चौकशी चे वावडे!… — उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून परस्पर चौकशी… — प्रकरण – बोगस लाभार्थ्यांना कडधान्य, निविष्ठा व अनुदान वाटपाचे…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कोरोना टाळेबंदी कालावधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालय साकोली मार्फत जांभळी/सडक येथे बोगस लाभार्थ्यांना १०० टक्के प्रात्यक्षिक आणि ५० टक्के अनुदानावर कडधान्य निविष्ठा व अनुदान वाटपाची तक्रारकर्ते कैलास भागवत गेडाम यांचे समक्ष चौकशी करावी. अशी विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांचेकडे मागणी असताना चौकशी व त्यानंतर फेरचौकशीतही चौकशी अधिकाऱ्याने त्यांना पाचारण करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे कृषी विभागास तक्रारकर्त्या समक्ष चौकशीचे वावडे असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. 

             कोरोना टाळेबंदी काळात तालुका कृषी अधिकारी साकोली मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जांभळी/सडक येथील बोगस लाभार्थ्यांना कडधान्य वाटप व निविष्ठा आणि अनुदान वाटपाची चौकशी करून तत्कालीन कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून वितरित केलेली रक्कम वसूल करण्यात यावी. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पवनी चे तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी निवेदनातील मागणी नुसार तक्रारदार यांचे समक्ष चौकशी केली नसल्यामुळे चौकशी अहवाल अमान्य करण्यात आला. तथा १२ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले. 

           निवेदकांची मागणी मान्य करून २८ सप्टेंबर २०२३ चे पत्रानुसार साकोली चे उपविभागीय कृषी अधिकारी के.जी. पात्रिकर यांची फेरचौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चौकशीस नकार दर्शवून दुसऱ्या फेरचौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अशी विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना विनंती केल्याने १६ ऑक्टोबर २०२३ चे पत्रान्वये भंडारा चे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांची फरचौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते २३ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय जांभळी/सडक येथे चौकशी कामी आले. पण तक्रारकर्ते कैलास गेडाम यांना पाचारण न करता तालुका कृषी अधिकाऱ्याचा कित्ता गिरविल्यामुळे अधिनस्त कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी चौकशीचे वेळी हेतू पुरस्पर तक्रार कर्त्यास बोलाविले जात नसल्याच्या जांभळी परिसरात चर्चा होत आहेत.