वादळ मुंबईकडे आगेकूच,मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यांनाच पाडले उघडे… — आर्थिक दुर्बल अनारक्षितांना १० टक्के आर्थिक आरक्षण तात्काळ मिळत असेल तर मराठ्यांना आरक्षण का म्हणून नाही?

संपादकीय

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

              मराठा आरक्षणा बाबत महाराष्ट्र सरकार वारंवार शब्दांची फेक फेकत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटलांचा अजिबात विश्वास राहिलेला नाही.

         यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आता शांत बसायचे नाही आणि मराठा आरक्षणा बाबत अंतिम लढाई लढताना हरायचे नाही असे मनोज जरांगे पाटलांनी ठरवले असल्याने त्यांनी करोडो मराठा बांधवांसह मुंबईकडे आगेकूच केली आहे.

          मुंबईत करोडो मराठा आया- भगिनी-बांधव येणार या घटनेनी महाराष्ट्र सरकारची झोप उडाली असून मराठा समाज बांधवांना व आया बहिणींना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मग्न झाल्याचे दिसून येते आहे.

           उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता द्या,मराठा समाजासह धनगर समाजाला सहा महिन्यात आरक्षण देतो.

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचे सध्यातरी दिसून येते आहे किंवा त्यांची स्मरणशक्ती कमी झाल्याचे समजून घेतले पाहिजे.

           दोन पैकी कोणत्याही प्रकारची स्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली असल्यास ते राजकारण करण्यात अयशस्वी ठरले आहेत किंवा ते सत्ता हस्तगत करण्यासाठी निखळ खोटे बोलतात हे लक्षात घेतले पाहिजे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुसऱ्यांच्या हातचे बाहुले असल्याने त्यांना स्वतःच्या समाजाच्या आरक्षणासी काही सोयरसुतक नाही या आविर्भावात ते वागणारच!

           महत्त्वाचा मुद्दा असा की,नियम तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे हे केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे काम आहे.त्यांनी मनावर घेतले तर मराठा आरक्षणाची समस्या निकाली काढण्यासाठी ते केव्हाचेच यशस्वी झाले असते.

             पण,आरक्षण मुद्दा लोंबकळत ठेवून मराठा समाजाला नाडवायचेच,या तोऱ्यात केंद्र सरकार व राज्य सरकार वागत होते असेच आजवरच्या त्यांच्या वाटचालीवरुन व घडामोडीवरुन स्पष्ट झाले आहे.

             मराठा समाजाच्या सर्व समस्या लक्षात घेता या समाजाला तात्काळ आरक्षण देण्याचा विचार महाराष्ट्र शासनासह केंद्र सरकारने का म्हणून केला नाही?हे लक्षात घेतले तर हा समाज राजकीय नेत्यांच्या भुलथापांना नेहमी बळी ठरतो असेच त्यांना वाटले असावे आणि म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाला गांभीर्याने पाहिले नाही.

              परंतु मराठा आरक्षणाचे नेतृत्व निरागस,निष्कलंकीत,नैतिक दृष्ट्या सक्षम व जबाबदार,चारित्र्यसंपन्न,निर्भिड, आत्मविश्वासी,धैर्यवान,धैर्यशील,व संवेदनशील आणि संवेदनक्षम व्यक्ती असलेल्या मनोज जरांगे पाटलांकडे गेले असल्याने अकारण बडबड करणाऱ्यांची भांबेरी उडाली.

              मनोज जरांगे पाटलांवर मराठा समाजाचे जिवापाड प्रेम असल्याने आरक्षणाच्या नेतृत्वाबाबत तेवढाच विश्वास आहे.यामुळे मनोज जरांगे पाटलांचा शब्द हा शस्त्रा पेक्षाही धारधार ठरत आहे व नियोजन बद्ध आंदोलनाचे यशस्वी रणसंग्राम ठरत आहे.

        न वाकणारा व न झुकणारा नेता समाजाला भेटला तर समाज पुर्ण शक्तिनिशी त्याच्या पाठीशी असतो,असेच वास्तव मनोज जरांगे पाटलांबाबत आहे.

            स्व समाजाच्या हितासाठी व उन्नतीसाठी आंदोलनातंर्गत संघर्ष करणे हा भारतीय संविधनातंर्गत मुलभूत असा घटनादत्त अधिकार आहे.याच अधिकारांचा सदुपयोग मनोज जरांगे पाटील करताहेत.

          यामुळे त्यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असलेले प्रयत्न नियमबाह्य आहेत हे सांगण्यापेक्षा हा समाज सुध्दा या देशातील मुळ राहणारा आहे आणि या समाजाला आरक्षण दिल्या गेले पाहिजे यावर सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यासाठी प्रसंगी नवीन कायदा तयार केला पाहिजे.

              प्रसंग व समस्या कुठल्याही प्रकारची असो,अनारक्षित उच्चवर्णीयांना आर्थिक दुर्बल या सदराखाली ईडब्लुएस अन्वये १० टक्के आरक्षण तात्काळ दिल्या गेले जात असेल तर,मग? मराठा समाजाला का म्हणून आरक्षण मिळणार नाही? मराठा समाजाला आरक्षण दिलेच गेले पाहिजे या मताचे मुंबईकर व महाराष्ट्र राज्यातील जनता असावी…

        कायद्याच्या चौकटी मोडून काढणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार काय?हे पुढे समजेलच..

          मात्र,मराठा समाजाचा मुंबईकडे रवाना झालेला करोडोंच्या संख्येतील मोर्चा अन्याय करण्यासाठी नाही तर स्व समाजाच्या हितासाठी असल्याने त्यांना सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा मराठा समाज बांधवांनी व आयाबहिणींनी का म्हणून बाळगू नये?