Home देशविदेश प्रजासत्ताक दिन आणि भारतीय नागरिक…

प्रजासत्ताक दिन आणि भारतीय नागरिक…

  उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीची केवळ रचना दिली नाही,तर तिचा आत्मा दिला.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ शब्दांत न ठेवता ती संविधानाच्या प्रत्येक कलमातून प्रत्यक्षात उतरवली.

    सामाजिक विषमता,जातीय भेदभाव आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला,हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खरी ताकद आहे.

      प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजवंदन,संचलन आणि भाषणांचा दिवस नाही,तो सर्वांनी आत्मचिंतन करण्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. 

        आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करताना कर्तव्यांची जाणीव ठेवतो का? लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणतो का?बहुसंख्याकतेच्या दडपशाहीविरोधात अल्पसंख्याकांचे हक्क जपतो का? हे प्रश्न या दिवशी अधिक तीव्रपणे आपल्यासमोर उभे राहतात.

    आजच्या काळात,जेव्हा लोकशाही मूल्यांवर,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत,तेव्हा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक वाढते. संविधान हे कोणत्याही एका पक्षाचे,सरकारचे किंवा विचारसरणीचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षणकवच आहे,ही जाणीव पक्की करणे अत्यावश्यक आहे. 

       म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा करताना केवळ “जय हिंद” म्हणणे पुरेसे नाही; तर बाबासाहेबांच्या संविधाननिष्ठ विचारांना रोजच्या आयुष्यात उतरवणे,”अन्यायाविरोधात उभे राहणे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सजग नागरिक म्हणून भूमिका बजावणे,हाच या दिवसाचा खरा सन्मान आहे.