दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील आळंदी ग्रामीण परीसरात विश्रांतवड लक्ष्मीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे सांगितले जात असून, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
लक्ष्मीनगर व आजूबाजूच्या भागात मोकाट कुत्रे, पाळीव जनावरे तसेच शेतालगतची मोकळी जागा असल्याने बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, परिसरात पिंजरे लावावेत तसेच रात्री गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



