विकासात्मक कामांच्या अंमलबजावणीवरून पंचायत समितीची वार्षिक आमसभा गाजली… — कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार कृष्णा गजबे यांनी धरले धारेवर…

ऋषी सहारे

संपादक

देसाईगंज-

      स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत.यात नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह विकास आराखड्यानुसार गावांचाही विकास व्हावा हा उदात्त हेतू ठेऊन योजना राबविण्यात येत आहेत.माञ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे स्थानिक नागरीकांनी मुद्दा उपस्थित करताच सभाध्यक्ष आमदार कृष्णा गजबे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून योजनांची यथाशिघ्र अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

      देसाईगंज पंचायत समितीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभा आयोजीत करण्यात आली होती.दरम्यान विकासात्मक कामांच्या अंमलबजावणीवरून वार्षिक आमसभा चांगलीच गाजत असल्याचे पाहु जाता कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार गजबेंनी चांगलेच धारेवर धरून समस्या यथाशिघ्र मार्गी लावण्याचे निर्देश दिले.यावेळी देसाईगंज तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार के.व्ही.चौधरी, संवर्ग विकास अधिकारी धिरज पाटिल, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, जयमाला पेंदाम, रोशनी पारधी, माजी सभापती मोहन गायकवाड, रेवता अणोले माजी सभापती, गोपाल उईके माजी उपसभापती, माजी उपसभापती नितीन राऊत, शेवंता अवसरे, अर्चना ढोरे, कोंढाळ्याच्या सरपंचा अपर्णा राऊत आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

     देसाईगंज पंचायत समितीच्या २० ग्रामपंचायती अंतग॔त एकुण ३९ गावे येत असुन शासन स्तरावरुन प्रत्येक गावाच्या विकासासाठी विकास आराखड्यानुसार नियोजन करण्यात येतो.त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.त्यानुसार विकासकामे होणे देखील अपेक्षित आहे.माञ प्रत्यक्षात विकासकामांची अंमलबजावणी होत नसल्याने स्थानिक नागरीकांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते.ही गंभीर बाब लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापली जबाबदारी ओळखून कर्तव्य पालन करण्याच्या सुचना दिल्या.

    दरम्यान तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्राॅस रेती व पाच ब्राॅस मुरुम मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांना ३ लाख रुपया पर्यंत प्रती घरकुल अनुदान देण्यात यावा, रखडलेल्या पांदन रस्त्याच्या बांधकामांना नंबर नसल्याने समस्या मार्गी लावुन पांदन रस्त्यांचे बांधकाम करण्यात यावे,कुरूड येथील पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यात यावी,कोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पटाच्या दानिवर करण्यात आलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार यांनी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना यथायोग्य मदत करावी,तालुक्याच्या मामा तलावातील गाळ उपसा करून खोलिकरण करण्यात यावे,वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई देण्यात यावी,तालुक्यात आरोग्य विभागात रिक्त पदांची यथाशिघ्र भरती करण्यात यावी,कसारी/तुकुम येथील स्मशानभूमी करीता पाच एकर जागेचा पट्टा देण्यात यावा, शिवराजपुर स्मशानभूमीतील शेडचे त्वरित बांधकाम सुरू करण्यात यावे,तलावांच्या जागेवर करण्यात आलेले अनाधिकृत अतिक्रमण त्वरीत काढुन टाकण्याची कारवाई करण्यात यावी,कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरित रुग्ण वाहिका उपलब्ध करून देण्यात यावी आदी उपस्थित करण्यात आलेल्या समस्या मार्गी लावण्या संदर्भात ठराव पारीत करण्यात आले.आमसभेला सर्व विभागाचे विभाग प्रमुख, तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी,ग्रामसेवक,

तलाठी आदी कर्मचारी, अधिकारी तसेच देसाईगंज पंचायत समिती अंतग॔त येत असलेल्या गावातील नागरिक उपस्थित होते.