दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे, ९ ऑक्टोबर २०२५
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक मदत पॅकेजचे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात ‘देवा’ भाऊंनी दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांना तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली.ही मदत दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याने पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले.
बळीराजाला दिलेले आश्वासन पूर्ण करीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेतकरी हिताचे सरकार असल्याचे दाखवून दिले.राज्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.ही मदत फक्त आर्थिक आधार नाही,तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण परत आणणारा निर्णय आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेले हे पॅकेज राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
परभणी, जालना, यवतमाळ, लातूर, बीड, नांदेड आणि सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतीचे जवळजवळ पूर्ण नुकसान झाले आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेली मदतीची घोषणा बळीराजासाठी दिवाळीपूर्वीची सर्वात मोठी भेट ठरेल.ही मदत म्हणजे फक्त पैशांची घोषणा नाही, तर शेतकऱ्यांच्या ओलसर मातीतील आशेचा नवा अंकुर फुलवणारी आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी १८,५०० रुपये, बागायतीसाठी २७,००० रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी ३२,५०० रुपये मदत देण्यात येणार आहे.तसेच शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत ही वाढीव मदत मिळणार आहे.राज्यातील अनेक भागात जूनपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याची आकडेवारी सरकार ने सादर केली असल्याचे पाटील म्हणाले.



