वारकरी भाविकांसाठी PMPML जादा बसेसची सोय…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर, उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी आणि देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात. त्यांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी दरवर्षी पुणे पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करण्यात येते. यावर्षीदेखील वारकऱ्यांसाठी आणि बाकी भाविकांसाठी PMPML जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

        भाविक आणि नागरिकांच्या सोयीसाठी 8 जूनपासून 12 जूनपर्यंत आळंदी करीता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस आणि जादा बसेस अशा दरदिवशी एकूण 142 बसेसची सोय करण्यात आली आहे. 11 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत आळंदीला जाण्यासाठी बस उपलब्ध असेल. याशिवाय देहूला जाण्यासाठी पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस आणि जादा बसेस अशा एकूण 30 बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय देहू ते आळंदी अशा 12 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.

        12 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीमधून होतं. त्यामुळे पहाटे अडीच वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासोबतच कायम सुरु असणाऱ्या बस सकाळी साडे पाच वाजेपासून सुरु असेल. नेहमीच्या मार्गावरील 113 बसेस आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत.

       याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस14 जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी बारा ते एक दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर आणि वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

      संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला आळंदीमधून प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशीभेट घडेल. वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली आहे. तर 10 जूनला देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाची आस लागली आहे.