Home Maharashtra चिमूर भुमिअभिलेख कार्यालय बनले लाचेचे केंद्र :- विलास डांगे चिमूर शिवसेना तालुकाप्रमुख… 

चिमूर भुमिअभिलेख कार्यालय बनले लाचेचे केंद्र :- विलास डांगे चिमूर शिवसेना तालुकाप्रमुख… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       चिमूर भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदर भूमी अभिलेख कार्यालय गैर आर्थिक व्यवहाराचे केंद्र बनले असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिंदे गटाचे चिमूर तालुका प्रमुख विलास डांगे यांनी केला आहे.

      यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व नागरिकांनी दाद नक्की मागायची कुणाकडे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

         शेतकरी आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी,जमिनीचे नकाशे मिळवण्यासाठी,सिटी सर्व्हे उतारा घेण्यासाठी,भूमी संपादनाची मोजणी खरेदी-विक्रीच्या वारस नोंदी व त्या संदर्भातील दाखले यांसारख्या अनेक कामानिमित्त कार्यालयात येत असतात. 

      परंतु त्यांची कामे ही कधीच वेळेवर होत नाहीत.याचे मुख्य कारण म्हणजे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत वसुली तर सुट्टीच्या आणि रात्रीच्या वेळेला काम करायला आवडते असा सनसनाटी आरोप शिवसेना तालुका प्रमुख विलास डांगे यांनी केला आहे. 

       सहसा गैर आर्थिक व्यवहाराचे व अंदाधुंद कारभाराचे मुद्दे लोक चर्चेचा भाग बनला आहे.त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्त लागणे गरजेचे असल्याचे म्हणणे परेशान शेतकऱ्यांचे व नागरिकांचे आहे.

          ऑफिसमध्ये आल्यानंतर कर्मचारी दुसरे काम आहे,असले कारण पुढे करीत आहेत,तर काही वेळा कामे ही आर्थिक देवाण घेवाणीसाठी मुद्दाम रखडवली जात असल्याचे बोलले जात आहे.

       यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी जे आहेत ते काम न करता वेळ काढूपणा करत असल्यामुळे कार्यालयातील कामकाज मंदावल्याचे चित्र बघायला मिळत आहे .

       भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जमिनीच्या मोजणी संदर्भात अनेक अनेक प्रश्न प्रलंबित असून ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून मोजणी केली आहे,त्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने करून दिल्या असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

       याचा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का?हा प्रश्न सुध्दा गंभीर आहे.

      भूमी अभिलेख कार्यालयात चाललेल्या या कामकाजाची पाहणी वरिष्ठ अधिकारी (मुख्य अधीक्षक भूमी अभिलेख) हे करणार का? आणि सर्वसामान्य लोकांच्या चाललेल्या या लुटी संदर्भात आणि चुकीच्या कामकाज पद्धतीविषयात कोणता निर्णय घेणार?हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

              अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही.बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात.सर्वसामान्य चुकून काम करण्यासाठी गेला तर असंख्य चकरा मारून ही काम होणार नाही.सदर प्रकरणी उपअधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय चिमूर यांनी लक्ष घालून दलालांचा सुळसुळाट बंद करावा अशी मागणी विलास डांगे तालूका प्रमुख चिमूर शिवसेना पक्ष (एकनाथ शिंदे गट) यांनी केली आहे.