Home Social मन की बात ऐकण्यासाठी जमली “विश्वकर्मांची” गर्दी…. — खा. सुनील मेंढे...

मन की बात ऐकण्यासाठी जमली “विश्वकर्मांची” गर्दी…. — खा. सुनील मेंढे व माजी आ.अनिल सोलेंचे विश्वकर्मा योजनेबद्दल मार्गदर्शन…

प्रितम जनबंधु 

  संपादक 

            भंडारा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात निमित्त आज भंडारा तालुक्यातील तिड्डी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “मन की बात विश्वकर्मा” के साथ असे घोषवाक्य असलेल्या या कार्यक्रमात समाजातील 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांनी सहभाग घेत पंतप्रधानांचे मार्गदर्शन ऐकले. यावेळी खासदार सुनील मेंढे व माजी आमदार अनिल सोले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

              समाजातील विविध स्तरातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध योजना प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. समाजातील अठरा प्रकारच्या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करून त्यांचे कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी थेट अशा 18 पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

          भंडारा तालुक्यातील तिड्डी येथे भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे जाहीर स्वरूपात प्रक्षेपण करण्यात आले. ग्राम पंचायत परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मंचावर खासदार सुनील मेंढे, विश्वकर्मा योजनेचे महाराष्ट्राचे प्रभारी माजी आमदार अनिल सोले, डॉ उल्हास फडके, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव महेंद्र निंबार्ते, पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे, तालुकाध्यक्ष विनोद बांते, सरपंच दत्तकुमार जगनाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.  

                    परिसरातील परंपरागत व्यवसाय करणारे अनेक कारागिरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधानांचे मनोगत ऐकले. 

               समाज घडविण्याच्या कामात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या अठरा परंपरागत कारागिरांचां सन्मान करण्याच्या दृष्टीने आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतुने ही योजना सुरू करण्यात आल्याचे अनिल सोले यांनी सांगून या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करा असे आवाहन केले.

 

          विश्वकर्मांना मार्गदर्शन करते वेळी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र सरकार हे कायम समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जुन्या काळात १२ बलुतेदारीच्या जोरावर सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. अशा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या 18 प्रकारच्या कारागिरांना प्रशिक्षित करून त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

          या योजनेचे महाराष्ट्र प्रभारी अनिल सोले यांनी विश्वकर्मा कौशल्य योजना ही कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान देणारी, त्यांच्यात कौशल्य वृद्धी करून व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी आणि चांगले आधुनिक साहित्य उपलब्ध करून देणारी योजना असल्याचे ते म्हणाले. यामुळे परंपरागत व्यवसायांना मान्यता मिळवून कौशल्य आणि संस्कृती जोपासण्यात मदत होईल असे सुद्धा त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांना पाच टक्के वार्षिक व्याज दराने कर्ज देऊन त्यांच्या कौशल्यात अधिक भर पाडण्याचा प्रयत्न आणि व्यवसाय वृद्धीसाठी आधार देण्याचे काम ही योजना करणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी सोले यांनी केले. 

              कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते तर आभारप्रदर्शन यशवंत मने यांनी केले.

                         यावेळी प्रामुख्याने ग्रामसेवक संदीप फुंडे, जनार्दन मने, उपसरपंच निकिताताई खंगार, यशवंत मने, पुनम भुरे, श्रीकृष्ण पाठक, कैलास खंगार, सुनील खंगार, हेमंत मेश्राम, मोहन खंगार पद्माकर भुरे, दिवाकर मने, मनोज पाठक, प्रमोद कांबळे, देवनाथ उवारे, रवींद्र मेश्राम, राजाराम खंगार, रवींद्र खोवदे आदी मान्यवर उपस्थित होते.