( काव्य )
जाणुनी महत्त्व
संविधानसभा निर्मितीचे
मिळविली साथ
चांभार आणि मुस्लिमांची
पश्चिम बंगालच्या मतदारसंघाची
निवडून गेले,संविधान सभेत.
दुसरे संकट भारत फाळणीचे
त्यांचा मतदारसंघ गेला पाकिस्तानात.
आवश्यकता वाटली काँग्रेसला
आंबेडकरांची
मसुदा समितीचे अध्यक्ष करण्याची
म्हणून त्यांनी निवडून आणले
आंबेडकरांना
मुंबई मतदार संघातून –१
अहोरात्र
बाबासाहेबांनी अभ्यास केला
जगातील लोकशाही देशाच्या
सर्व संविधानाचा,
2 वर्ष 11 महिने 18 दिवस,
आणि निर्मिले एक उच्चतम दर्जाचे
जगाला मार्गदर्शक ठरेल असे
भारतीय संविधान.—-२
तरीपण म्हणाले की
संविधान कितीही चांगले असले
तरीही ते राबवणाऱ्यावर
ते चांगले की वाईट
हे अवलंबून आहे.
हे संविधान जर
विषमतावाद्यांच्या ताब्यात गेले तर
याचा ते दुरुपयोग च करतील
आणि
समतावाद्यांच्या ताब्यात गेले तर
ते या संविधानाचा सदुपयोगच करतील —३
संविधान सभेला संबोधित करताना
बाबासाहेब म्हणाले की,
जर राजकीय पक्षांनी
स्वतःच्या तत्वप्रणालीला
देशापेक्षा मोठे मानले तर
आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल.
कायमचे पण घालविले जाईल.
या देशाचा इतिहास सांगतो
हा देश अनेकवेळा पराभूत
झाला आहे.
त्याची पुनरावृत्ती नको.–४
बाबासाहेब म्हणाले
विविध संस्कृतीचा
धोका आहे या देशाला
या देशाच्या
एकतेला आणि एकात्मतेला.
म्हणून उपाय मी दिला
आराधना श्रद्धा भक्ती स्वातंत्र्याचा.
याचसोबत धोकाही सांगितला
तो असा की,
धर्मातील भक्ती ही
आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असला
तरी
राजकारणात व्यक्तिपूजा ही
हुकुमशाहीकडे नेणारा मार्ग होय.–५
” प्रथम मी या देशाचा नागरिक
आणि अंतिमतः पण मी नागरिक”
असे तत्वद्न्यान मांडणारे
बाबासाहेब हे थोर देशभक्त –६



