राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
दिव्यांग बांधव समाजाचा प्रमुख घटक असुन त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान घेण्याकरिता येणाऱ्या समस्या निकाली काढण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना.आशिष जयस्वाल गडचिरोली दौऱ्यावर आले असता प्रत्यक्ष भेट घेत त्यांना निवेदन सादर करून समस्या सोडवण्याची मागणी केली.
यासंदर्भात सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिव्यांग बांधवाच्या समस्या संदर्भात बैठक घेऊन समस्या निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन सादर करताना गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार भाजपाचे कार्यकर्ते रोशन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रशासनाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांविरोधात कुरखेडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
शासनाने दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने संजय गांधी दिव्यांग योजना अंमलात आणली आहे.या योजनेचा अनेक लाभार्थींना फायदा होत असतानाच,अलीकडील प्रशासनाच्या निर्णयामुळे फक्त कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांनाच विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिणामी,तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेल्या अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.
मार्च-एप्रिलपासून तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येणार असल्याने संबंधितांवर शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण वाढत चित्र निर्माण झाले असून या निर्णयाचा पुनर्विचार करून तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी गडचिरो जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली आहे.



