Home Maharashtra अनुकंपा पदभरती प्राधान्याने करा,जिल्हाधिकारी यांचे निर्देश…

अनुकंपा पदभरती प्राधान्याने करा,जिल्हाधिकारी यांचे निर्देश…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली, जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांपैकी किमान २० टक्के पदे अनुकंपा यादीतील उमेदवारांमधून भरावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विभागप्रमुखांना दिल्या. अनुकंपा भरती प्रक्रियेस गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

         निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, ज्या शासकीय कार्यालयांकडे स्वतःची अनुकंपा प्रतीक्षा यादी उपलब्ध नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाईक प्रतीक्षा यादीतून उमेदवारांची मागणी करावी.

        विशेष बाब म्हणून, नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेत सामावून घेण्याबाबत ६ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. सदर निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीत सध्या ९८ उमेदवार नोंदले गेले असून, त्यांनाही अनुकंपा भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पार पाडण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

         जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन २०२४ व दिनांक ०१.०१.२०२५ पर्यत पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करुन गृहचौकशी अहवालाच्या अधिन राहुन पुर्ण माहिती असलेल्या एकूण २२४ उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या http://gadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

         प्रतिक्षाधिन सुचितील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाद्वारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला/भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली सुहास गाडे यांनी केले आहे.