भाविक, वारकऱ्यांना आरोग्याबाबत सर्व सुविधा पुरविणार : डॉ.उर्मिला शिंदे… — प्रस्थान सोहळा काळात 130 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 12 दिवसांवर आला आहे. यावर्षी प्रस्थान सोहळ्याला 2 लाखावर भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आळंदी शहर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त 130 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांची मागणी आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 

         वैद्यकीय अधिकारी – 20, स्टाफ नर्स – 25, परिचय आणि सफाई कामगार -25, लॅब टेक्निशियन -8, औषध निर्मान अधिकारी – 15, एक्स -रे टेक्निशियन -8, अॅम्बुलन्स(108/102) 4, बुथसाठी वैद्यकीय पथक – 5, या अधिकारी कर्मचाऱ्यांची वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. 

        तसेच सोहळ्यादरम्यान, माऊली मंदिर, दर्शन बारी, घाट परिसर, चाकण चौक, वडगाव चौक या ठिकाणी बुथ असणार आहेत. खाजगी रुग्णालयात 10 टक्के खाटा वारकरी भाविकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. याबाबतच्या लेखी सुचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी शहरातील सर्व स्त्रोतांचे नमुने घेणे सुरू आहे. किटकजन्य आजाराचे, मलेरिया, डेंग्यू, चिकणगुणिया, करोना, आदी आजारांचे सर्वेक्षण आरोग्य सेविकामार्फत सुरु आहे. सोहळ्यादरम्यान हाॅटेल्समध्ये स्वच्छता व अन्न पदार्थाची शुद्धता राखण्याच्या दृष्टीने ना हाॅटेल्स चालकांची बैठक आयोजित करण्यात येणार असून हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. भाविक, वारकऱ्यांना आरोग्याबाबत सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ.उर्मिला शिंदे यांनी दिली.