भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म,पोस्ट नं.१४९… — निब्बाणावरील प्रवचन… — निब्बाण म्हणजे काय?

 

     — एक समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तांसह राहत होते.

— तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले,’ भिक्खूहो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो.’

— इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले.

— सारीपुत्त मागे राहिले होते, भिक्खूनी त्यांना निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली.

— तेव्हा भिक्खूना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाले, “भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे.

— हा लोभ आणि हा क्रोध यांचा निरास कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि स्मृती, आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय.

— तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म,सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय.

— क्रोध, दुष्ट बुद्धी,द्वेष,मत्सर, कृपणता, लोभ,ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल कर्म आहेत.

— गर्व,सुस्तपणा यांचा निरास करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पहायला दृष्टी आणि ज्ञान देतो,शांती,प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे.

— निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय.

— त्या महास्थविर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदीत झाले.

( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म,लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,पान नं.३०१.)

                संकलन

         आयु.प्रशांत चव्हाण सर.