सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती-निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

 सावली ( ता.प्र) सुधाकर दुधे

        भारतीय आरक्षणाचे जनक,रयतेचे राजे, राधानगरी धरण प्रकल्पाचे जनक, बहुजन प्रतिपालक, उत्कृष्ट मल्ल पट्टू, लोकनायक, कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त अभिवादनपर सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय, सावली येथे आयोजित करण्यात आला होता.या वेळी महाराजांना पुष्पहार-फुले अर्पण करून त्यांचा नावाचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले.

        राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

         ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास”फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.

        अभिवादनपर कार्यक्रमाला सावली नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष सौ.अंजली दमके, सावली महिला काँग्रेस शहराध्यक्ष सौ.भारती चौधरी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार, बांधकाम सभापती सौ. साधना वाढई, पाणीपुरवठा सभापती अंतबोध बोरकर,नगरसेवक प्रीतम गेडाम, प्रफुल वाळके, नगरसेविका सौ.ज्योती गेडाम, तसेच कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.