Home Maharashtra आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते...

आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन… — ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ घोषणांनी दुमदुमला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पुणे : देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय तळमजला येथे आयोजित विशेष प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, तहसीलदार श्वेता पवार, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.

     यावेळी आणीबाणी कालावधीत बंदिवास सोसलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला.

      या प्रदर्शनास भारताच्या प्राचीन कालखंडापासून टप्प्या- टप्प्याने विकसित झालेली लोकशाही परंपरा, स्वतंत्र्योत्तर भारत आणि संसदीय प्रणाली, आणीबाणीपूर्व आणि आणीबाणी कालावधीत घडलेल्या घडामोडी आदी माहितीचे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय तळ मजला, ए विंग येथे २५ जुलै २०२५ पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.