पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण भर पावसात मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले… — माऊलींच्या पालखीचा आज माळशिरसमध्ये मुक्काम…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

माळशिरस : आषाढी पायी वारीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २३ जूनला सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण भर पावसात शनिवारी पुरंदावडे (ता.माळशिरस) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले.

      परब्रम्हाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या तालावर असे रिंगण धरले. हा अभुतपुर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भर पावसात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यंदा रिंगण सोहळ्यात पावसाच्या आगमनाने वारकरी सुखावले, भाविकांची प्रचंड गर्दी, पालखी शेजारी फडकणाऱ्या भगव्या पताका, मनोहरी रांगोळी, अखंड ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर अशा जल्लोषपुर्ण व भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा माऊलींच्या मानाच्या अश्वांने भर पावसात बेफाम वेगात दोन फेऱ्या मारुन पुरंदावडे येथील पहिले गोल रिंगण रंगविले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुरंदावडे येथे दुपारी तीन वाजता रिंगणाजवळ आला. त्या अगोदर मानाच्या अश्वांसह दिंड्या बाहेरील रिंगणात होते. दिंड्या पाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने सुध्दा रिंगणात प्रवेश केला.दरम्यान पालखी सोहळ्यातील दिंडीतील पताकाधारी, तुळशीवाल्या महिलांना मध्येभागी प्रवेश देण्यात आला.दिंड्यातुन वाट काढत बाहेरील रिंगणात मधोमध उभारण्यात आलेल्या मंडपात विराजमान झाली.

       दरम्यानच्या काळात पावसाने दमदार हजेरी लावली भर पावसात सुध्दा दिंडीमधील टाळ मृदुंगाचा गजर टिपेला पोहोचला होता. वारकरी देहभान विसरून नाचत होते. दिंड्यांमध्ये हरीनामाचा गजर सुरू होता. रिंगणात रांगोळ्या काढल्या होत्या. रिंगणाची पाहणी चोपदारांनी केली, यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफाळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार उपस्थित होते. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास भोपळे दिंडीच्या सेवेकऱ्यांनी रिंगणाला तीन फेऱ्या मारल्या, त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माऊलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली.

       काही क्षणात दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगणात दोन फेऱ्या मारल्या अन् माऊली नामाने अवघे रिंगण रंगून गेले. रिंगण संपताच अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी भाविकांची झुंबड उडाली होती. आता पंढरपूर जवळ जवळ आल्याने एकीकडे आनंद आणि रंगलेल्या रिंगणामुळे वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. उडीच्या खेळानंतर रिंगणाची सांगता झाली. वारकऱ्यांची टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर पडणारी पावले अन् त्यातून उमटणारा ताल हा आनंद अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. थोडा विसावा घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळशिरस मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.